अहमदनगर : विविध ग्रामपंचायतीच्या १ हजार ५५० सदस्यांनी जात प्रमाणपत्र अद्याप दाखल केले नाहीत़ त्यामुळे या सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, सुनावणी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली़ जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ आॅगस्ट २०१५ रोजी पार पडल्या़ निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी ५ आॅगस्ट रोजी प्रशासनाने जाहीर केला़ निकालानंतर सहा महिन्यात जात प्रमाणपत्र दाखल करावे, असा संकेत आहे़ मात्र ७५० पैकी १४९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांनीच फक्त जात प्रमाणपत्र मुदतीत दाखल केले़ उर्वरित ६०१ ग्रामपंचायतींच्या १ हजार ५५२ सदस्यांनी जातीचे प्रमाणपत्र दाखल केले नाही़ त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली़ त्यावर लवकरच सुनावणी घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे़ प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी सदस्यांना सहा महिन्यांची मुभा दिली गेली़ सहा महिन्यांची मुदत देवून सदस्यांनी प्रमाणपत्र दाखल केले नाही़ त्यामुळे त्यांचे पद रद्द होऊ शकते़ कारवाईपूर्वी त्यांना म्हणणे सादर करण्याची संधी दिली जाणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
दीड हजार सदस्यांवर टांगती तलवार
By admin | Updated: June 17, 2016 00:02 IST