मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पाच दिवसांत दोन दिवस पाणलोटातील घाटघर, रतनवाडी, पांजरे आणि भंडारदरा येथे सुमारे २०० मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
मात्र गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी होत गेला. भंडारदरा धरण परिसरात दिवसभराच्या बारा तासांत १९ मि.मी. पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रात एकूणच पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणात होणाऱ्या नवीन पाण्याची आवकही कमी झाली. सायंकाळी सहा वाजता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा ६ हजार ७०१ दशलक्ष घनफलट इतका झाला होता.
हरिश्चंद्रगडाच्या पर्वत रांगांतही दिवसभरात पावसाचा जोर ओसरला होता. सकाळी सहा वाजता कोतुळ जवळील मुळा नदीचा विसर्ग ४ हजार ७०५ क्यूसेस इतका होता.
कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगातही पावसाचे प्रमाण कमी झाले. वाकी येथील लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो होऊन आता कमी झाला असून सायंकाळी सहा वाजता ७८९ क्यूसेसने पाणी नदीपात्रात सुरू आहे. या पाण्याबरोबर निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही शुक्रवारी दिवसभर ऊन पडले होते. निळवंडे धरणातील पाणीसाठा सकाळी सहा वाजता १ हजार ९१३ दशलक्ष घनफूट इतका झाला होता.