तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिरावर शुक्रवारी सुवर्णकलश बसविण्यात आला.शिर्डी व मोहटादेवीनंतर सुवर्ण कलश बसविलेले मढी येथील कानिफनाथांचे तिसरे मंदिर ठरले आहे. १ मार्च २०११ पासूनचे नाथभक्त व ग्रामस्थांच्या इच्छेनुसार कार्यरत विश्वस्थ मंडळाने सुवर्ण कलशासाठी निधी संकलन सुरू केले होते. यावेळी एकूण ३४ लाख रुपये जमा झाले होते. श्रावणी शुक्रवारचे औचित्य साधून महंत ज्ञानेश्वर कराळे, प्रदीप महाराज (बाळनाथगड) यांच्याहस्ते विधीवत पूजा करून सुवर्ण कलश रोहन सोहळा पार पडला. वादाच्या पार्श्वभूमीवर केवळ सुवर्ण कलशाचे काम आमच्या कालखंडात पूर्ण झाले, असा खुलासा विश्वस्त चंद्रकांत गाडे यांनी करताच समारंभात प्रचंड हशा झाला. ज्ञानेश्वर कराळे यांनी मार्गदर्शन केले. सुमारे अर्धा किलो सोने सुवर्णकलशासाठी वापरण्यात आले. त्यामुळे किमान ५० वर्षांच्या पुढे या कलशाचे आयुष्यमान राहील, असे सुवर्ण कारागीर परेश कुलकर्णी यांनी सांगितले. (वार्ताहर)मढी देवस्थानच्या सुवर्ण कलशासाठी देवस्थानचे कोषाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी भरीव आर्थिक मदत केली आहे. वास्तविक, येथे सुवर्णकलश करण्याचा संकल्प पवार यांनी केला होता. हा संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान आहे, असे पवार यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
नाथ मंदिरावर सुवर्णकलश
By admin | Updated: August 2, 2014 01:05 IST