उक्कलगाव : दोन वर्षांपासून राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे सर्वच व्यवस्था ठप्प झाल्या आहेत. शेतकरी चिंतातुर असताना वाळू माफिया मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत, अशी टीका भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. गळनिंब येथे ३३ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शामराव चिंधे होते.
विखे म्हणाले, शेतीमालाला सरकार भाव देऊ शकले नसल्याने उत्पादित माल शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. परंतु, सरकारला त्याची कुठलीही जाणीव नाही. गावपातळीवर आता युवकांनाच शेती आणि दुग्ध व्यवसायात एकत्रित येऊन काम करावे लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सामान्य माणसाला कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. लोकांपासून हे सरकार दूर गेले आहे. बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाबरोबरच आता सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात कोल्हार ते बेलापूर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक झाल्यामुळेच या रस्त्याची दुर्दशा झाली. गळनिंब येथे प्रवरा सहकारी बँकेचा विस्तार कक्ष सुरू करण्याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याचे याप्रसंगी विखेंनी सांगितले. गळनिंब येथील सिद्धेश्वर देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही विखे यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर शरद नवले, सभापती संगीता शिंदे, माजी सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, कल्याणी कानडे, प्रवरा बॅंकेचे संचालक हनुमान चिंधे, चांगदेव भागवत, रामदास देठे, संपतराव चितळकर, आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य सेविकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच शिवाजी चिंधे, उपसरपंच कविता भोसले, अनिता शेरमाळे, सुलोचना मारकड, दत्तात्रय माळी, बाळासाहेब वडितके, संजय शिंदे, अनिल चिंधे, शंकर वरखड, सोमनाथ चिंधे, आण्णासाहेब शिंदे, गोपीनाथ जाटे, बाळासाहेब पारखे, जनार्दन घोरपडे, गणपत चिंधे, रंगनाथ शिंदे, तान्हाजी देठे, डाॅ. सुनील चिंधे, मुख्याध्यापक अशोक नान्नोर उपस्थित होते.