कोपरगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने प्रत्येकी ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली आहे. कर्जमाफी योजनेतील शेकडो शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम तत्काळ जमा करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली.
जिल्हा बँकेअंतर्गत तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी २७५ असून, त्यांना सुमारे ७ कोटी ६१ लाख ९६ हजार रुपये, तर नियमित कर्ज परतफेड करणारे १६ हजार ५७७ शेतकरी आहेत. त्यांना १०८ कोटी ५६ लाख रुपये मिळणार आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. मागील हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे त्यांच्या हातून खरिपाचे पीक वाया गेले, तर रब्बी हंगामाची पिके उभी करताना त्यांना पैशांची जमवाजमव करताना कष्ट पडले, त्यात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहिले आहे. रब्बी पीक काढणीला आले आहे. त्याचा खर्चही मोठा आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम तत्काळ जमा करून शासनाने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.