अहमदनगर : प्रभाग पोटनिवडणुकीत मताधिक्य घटल्याने युतीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी कार्यकर्त्यांच्या घरावर दगडफेक केली. राज्यातील सत्तेचा गैरवापर करून सेनेने शहरात दहशत सुरू केली आहे. बाहेरून आणलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे मतदार बाहेर निघाले नाहीत. पर्यायाने मताचा टक्का घटला. आघाडी कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करणाऱ्यांना अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यावेळी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.निकालानंतर नगरसेविकेच्या कुटुंबातील व्यक्तीने आघाडीचे योगेश ठुबे, बाळासाहेब पवार, सचिन लोटके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यांच्या घरासमोर फटाके फोडले. आघाडीचा उमेदवार नवखा होता, शिवाय स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतल्याने गतवेळच्या तुलनेत राष्ट्रवादीने चांगले मतदान मिळविले. युतीने बाहेरून गुंड प्रवृत्तीचे लोक शहरात आणले होते. त्यांनी मतदारांना बाहेर पडण्यास मज्जाव केला. त्यामुळे मतांची टक्केवारी घटली. राज्यातील सत्तेचा संदर्भ देत बांधकाम व्यावसायिकांनाही धमकावण्यात आले. या प्रकारामुळे स्थानिक लोक भयभीत झाले आहेत. लोकशाहीत कोणी कोणाचे काम करायचे, याचे स्वातंत्र्य आहे. सेनेची गुंडागर्दी योग्य नाही. आम्ही विकासाचा मुद्दा पुढे केला होता. हल्लेखोरांना अटक करावी, यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली जाणार असून अटक न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा आमदार जगताप यांनी दिला. महापौर कळमकर म्हणाले, अनेक वर्षे सेनेने संरक्षणाचा मुद्दा पुढे करून निवडणुका लढविल्या. अशाप्रकारची गुंडागर्दी म्हणजे संरक्षण आहे काय? निवडणूक प्रचारात विकासाचा शब्द दिला, तो पाळला जाईल, असे कळमकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मताधिक्य घटल्याने गुंडागर्दी
By admin | Updated: April 19, 2016 00:16 IST