अहमदनगर : भाजपने जिल्ह्यात विस्तारकांच्या नियुक्त्या केल्यानंतर बुथरचना स्ट्राँग करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये भाजपच्या विस्तारकांनी तालुक्यांमध्ये बुथ तयार करून तब्बल ८० हजार कार्यकर्ते जोडले आहेत. आगामी निवडणुकांच्यादृष्टीने पक्ष संघटना मजबूत करण्यावर पक्षाने भर दिला आहे. मुख्यमंत्री वॉर रुममधून विस्तारकांशी नियमित संपर्क केला जात आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असली तरी कर्जमाफी, जीएसटी या गोष्टींमुळे सरकारबाबत सामान्य नागरिकांमध्ये रोष आहे. त्याची दखल पक्ष पातळीवरही घेतली गेली आहे. चार-पाच महिन्यांपूर्वी पक्षाने संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक विधानसभेला एका विस्तारकाची नियुक्ती केली आहे. पक्षातील जुना-जाणत्या कार्यकर्त्याला विस्तारक म्हणून जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात बारा विधानसभा मतदार संघात बारा विस्तारक नियुक्त असून तेवढेच पालक आहेत. विस्तारक मतदारसंघात आल्यानंतर पालकांनी त्यांची संपर्क, निवास, भोजनाची व्यवस्था करायची आहे. प्रशिक्षित विस्तारकांना पक्षाने मोबाईल दिले आहेत. हे मोबाईल थेट राज्य आणि राष्ट्रीय पक्ष कार्यालयाशी जोडलेले आहेत. मुख्यमंत्री वॉर रुममधून विस्तारकांशी नियमित संपर्क केला जात आहे. यामुळे विस्तारक नेमके कुठे काम करतात, याचे ट्रॅकिंग होते. तशी जीपीएस सिस्टिम मोबाईलमध्ये आहे.एका विस्तारकाने मतदारसंघात बुथ रचना करायची आहे. एका बुथमध्ये ३० कार्यकर्ते जोडले आहेत. त्यांचे नाव,पत्ता, मोबाईल क्रमाकांसह मोबाईल अॅपमध्ये माहिती साठविण्यात आली आहे. एखाद्या बुथवरील कार्यकर्त्याशी थेट मुख्यमंत्री वॉर रुममधूनही संपर्क साधला जावू शकतो. जिल्ह्यात ३ हजार ५९९ बुथपैकी २ हजार ६६४ बुथ रचना पूर्ण झाली आहे. या माध्यमातून ७९ हजार ९२० कार्यकर्ते थेट जोडले आहेत. राहिलेली बुथरचना महिनाभरात पूर्ण होणार आहे.
विस्तारकांचा साधेपणा
‘संघ प्रचारका’प्रमाणेच विस्तारकांच्या कामाची पद्धत आहे. कार्यकर्त्यांच्या घरी भोजन घेणे, दुचाकीवरून फिरणे, साधे कपडे वापरणे अशा सूचनाच विस्तारकांना आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्येच विस्तारकांना प्रशिक्षण दिलेले आहे. विस्तारकांनी त्यांची दैनंदिनी एका साध्या कार्यकर्त्याप्रमाणेच ठेवली आहे. गावात सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळावी, यासाठी विस्तारकांना आचरण बंधनकारक आहे.
एकूण बुथसंख्या (कंसात रचना पूर्ण झालेली बुथसंख्या)
कर्जत-जामखेड- ३४५ (३४५), नेवासा-२६४ (२३५), नगर शहर-२६४ (११९), श्रीरामपूर- २९१ (१९६), अकोले -३०४ (२८०), संगमनेर -२६५ (२०२), राहुरी- ३००(२९३), कोपरगाव-२६२ (२२७), पारनेर-३६९ (२००), शिर्डी-२५५ (४५), श्रीगोंदा -३३५ (१७९). एकूण-३५९९ (२६६४).
बुथरचना स्ट्राँग असलेला सध्या भाजप एकमेव पक्ष आहे. बुथला जोडलेल्या कार्यकर्त्यांची नावे, पत्ता, मोबाईल क्रमांक याची माहितीच अॅपवर आहे. जिल्ह्यात नव्याने सव्वालाख कार्यकर्ते थेट भाजपशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे तळापर्यंत भाजप मजबूत झाला आहे. भारतीय जनता पक्षाची आगामी निवडणुकांसाठीची ही एकप्रकारे तयारीच आहे.-प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष-ग्रामीण, भाजप