श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जमिनीतील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे फळबागांसह इतर पिके जळून चालली आहेत. शेतीसाठी कुकडीचे १५ एप्रिलपासून आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली. कुकडी, विसापूर, घोड धरणे शंभर टक्के भरली. मात्र कुकडीच्या येडगाव धरणातून शेतीसाठी अवघे एकच आवर्तन सोडण्यात आले. ‘घोड’चे दुसरे आवर्तन सोडण्यात आले असून विसापूरमधून ही १५ एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे.
कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी (दि.९) पुण्यात होणार आहे. या बैठकीत कुकडीच्या येडगाव धरणातून १५ एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. शेतीसाठी आवर्तन न मिळाल्यास लाभक्षेत्रातील फळबागांसह इतर पिके जळून जातील.
--
कुकडीवर नेहमी अन्याय..
डिंभे, पिंपळगाव जोगे धरणातून प्रत्येकी दोन टीएमसी पाण्याची तरतूद येडगाव धरणात तातडीने केली तर शेतीसाठी आवर्तन सुटू शकते. यासाठी लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे.
-राजेंद्र म्हस्के,
अध्यक्ष, कुकडी घोड पाट पाणी समिती
--
०७ कुकडी
कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा तालुक्यातील पाण्याअभावी करपू लागलेल्या लिंबू बागा.