शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

वाया नका घालू थेंबभरही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST

-------------- हल्ली दिनविशेष साजरा करण्याच्या जणू स्पर्धाच निर्माण झाल्या आहेत. असा एकही दिवस नाही, ज्यादिवशी दिनविशेष साजरा होत ...

--------------

हल्ली दिनविशेष साजरा करण्याच्या जणू स्पर्धाच निर्माण झाल्या आहेत. असा एकही दिवस नाही, ज्यादिवशी दिनविशेष साजरा होत नाही. दिनविशेषांची नुसती भाऊगर्दी झाली आहे. तरीही विधायक गोष्टी घडवून आणावयाच्या असतील तर दिवस साजरे करण्याचेही तितकेच महत्त्वाचे आहे. जलदिन साजरा करताना प्रत्येकाने पाण्याचा हिशेब ठेवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. दिनांक २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वेगळा विचार मांडणारा हे लेख.

-------------------

आज सगळीकडे जागतिक जलदिन साजरा होत आहे. यानिमित्त आपल्या बाह्या मागे सारून फेसबुक, व्हॉट्सॲप, दूरदर्शन, बातम्या, समाजमाध्यमांवर मोठमोठ्या चर्चा करतील. व्याख्यानावर व्याख्याने झडतील. मुलाखतींना ऊत येईल. देशा देशांतील काहीबाही आकडेवारींचा प्रचंड हिशोब मांडला जाईल. आलेखांद्वारे संख्यांच्या चढउताराची तगमग दाखवली जाईल. गाव, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रदर्शने भरवली जातील. जाहिरातींचा भडिमार केला जाईल. सर्व काही संपलं आहे, अशी खंत व्यक्त केली जाईल. एखाद्या देशाची रोल मॉडेल म्हणून देशादेशांत कितीही प्राकृतिक भिन्नता असली तरी त्याचे अनुकरण करण्याचा आग्रह धरला जाईल. तिकडे आहे मग इकडे का नाही? म्हणून आर्त साद घातली जाईल. या धामधुमीत लाखो करोडो डॉलरचा नुसता चुराडा केला जाईल. टपकणारा नळ बंद करण्याचा संदेश देणाऱ्या पोस्टरखालील नळाची तोटी गायब झालेली पाहून कोणाला वाईट वाटणार नाही? जलप्रदूषणावर उपाय सुचवणाऱ्या महाशयांच्या खुर्चीमागील कनातीजवळ तुडुंब भरलेलं गटार कोणाला दिसणार नाही. जेवणाच्या पंगती उठल्यानंतर तिथेच खरकटे अन्न, पत्रावळ्या फेकताना नी हात धुताना वाया जाणारे पाणी पाहून कोणाच्याच डोळ्याला पाणी येणार नाही. जलदिनाचे कौतुक करणाऱ्यांचे पोस्टर बनवण्यासाठी किती झाडांची कत्तल करावी लागली असेल? हा प्रश्न कोणालाच भेडसावणार नाही. हातचं सोडून धावत्याच्या मागे या म्हणीप्रमाणे पाण्याचा जपून काटकसरीने वापर करायचे सोडून समुद्राचे पाणी पिण्यासाठी, शेतीला वापरण्यायोग्य करता येईल का? यासाठी धाडसी प्रकल्प हाती घेण्याचे मनसुबे रचले जातील. लोकसंख्येला आळा घालायचं सोडून समुद्रात भर घालून तिथे लोकवस्ती उभारल्याच्या मस्तीत मिजास मिरवताना जलचरांच्या जैवविविधतेवर आपण घाला घातला आहे, हे सोयीस्करपणे जो तो विसरून जाईल. नद्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातील, पण तो गुदमरूच नये म्हणून मनोवृत्ती बदलण्यासाठी काहीच केले जाणार नाही. रात्रंदिवस बेसुमार विनाकारण स्वैर पाणी उपसा करणाऱ्या वीजपंपांचे वीजबिल माफ करा म्हणताना कुणाला थोडीही लाज वाटणार नाही? ते बिनदिक्कतपणे माफ केल्याचा कोणाला पश्चात्तापही होणार नाही. पाणी अडवा पाणी जिरवा यांसारख्या उपक्रमांची स्तुती करतानाच जमिनीची चाळणी करुन कूपनलिकांची वाढलेली संख्या व उपसासिंचनाखाली वाढलेल्या बागायती क्षेत्राची आकडेवारी सांगताना_कोणालाही विसंगती वाटणार नाही.

मग खरंच परिस्थिती इतकी वाईट आहे का? असाही प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पण, सोपी गोष्ट अवघड करून सांगितल्याशिवाय अलिकडे हुशारी नी कर्तबगारी सिद्धच होत नाही. एखादा प्रश्न चुटकीसरशी सुटला तर त्याचं गांभीर्यच आपल्या लक्षात येत नाही. समस्या सोडवण्यापेक्षा समस्या वाढवण्याकडे बहुतेक जणांचा कल असल्याचे दिसून येते.

मी समस्या सोडवण्यासाठी आहे. निर्माण करण्यासाठी नाही. ही मनस्थिती प्रत्येकात निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत, असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही. आता जलदिनाचाच विषय घेऊन विचार केला तर ही फार अवघड न सुटणारी समस्या आहे का? तर तसे अजिबात नाही. प्रत्येकाने दररोज वापरलेल्या पाण्याचा हिशोब ठेवण्यास सुरुवात केली तर अब्जोलीटर पाण्याची त्याच क्षणी बचत होईल. मोठी माणसे टपकणारा नळ बंद करताना, बदलताना लहानग्यांना दिसली तर अल्पावधीत जलदुतांची एक आदर्श पिढी निर्माण होईल. ठिबक, तुषार यांसारख्या जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती एकूण एक शेतकऱ्याच्या शेतात झिरपू लागल्या तर दुष्काळ, वीजकपात या समस्याच डोके वर काढणार नाहीत. खरकटे, उष्टे पाणी, सांडपाणी जर परसबागेत खेळू लागलं तर पाणी टंचाईची समस्याच भेडसावणार नाही. प्रत्येक इमारत, घर, मंदिर, मशीद, देवालयाच्या छतावरील थेंब नि थेंब जमिनीत विना धाक, कुठल्याही प्रलोभनाशिवाय जिरवण्याची निकोप स्पर्धा निर्माण झाली तर पृथ्वीच्या पोटातील धगधग शमवण्यास कितीसा तो वेळ लागेल? पण हे सर्व झालं पाहिजे ते वैयक्तिक पातळीवर. प्रत्येकाच्या मनाची तशी घडवणूक करण्यासाठी आपल्याला झटावं लागेल. वाया जाणारा थेंब नि थेंब उपयोगात आणण्यासाठी, साठवण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली पाहिजे. यात तसूभरही आपण कमी पडता कामा नये. वाया जाणारे, वाहून जाणारे पाणी पाहून जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होईल असं वातावरण तयार करण्यात यशस्वी होत नाही, तोपर्यंत २२ मार्च या दिनाला काहीच अर्थ उरणार नाही. कायदे, नियम, संस्कार, शिकवणूक यांचा जोपर्यंत मनापासून स्वीकार होत नाही, तोपर्यंत ते कवडीमोल नि व्यवहारशून्य ठरतात. त्यांचे मूल्य वाढवायचे असेल तर त्यांची रुजवणूक मनामनात व्हायला हवी. नाहीतर वर्षातून एखादा दिन निवडून त्याच दिवसापुरते स्वप्न पाहायचे, नि दाखवायचे नि वर्षाचे ३६५ दिवस नुसते दिनविशेष साजरे करण्यात दवडले, तर चुळभर पाण्यात जीव देण्याइतके जीवन ही आपल्या हाताशी उरणार नाही. जगाची चिंता सोडून प्रत्येकाने स्वतः स्वतःची काळजी घ्यायला शिकले पाहिजे. म्हणजे जग आपोआपच चिंतामुक्त होईल, हे नक्की.

हाक ऐका माझी ही दिनवाणी

वाया नका घालू थेंबभरही पाणी

शुष्क कोरडी जर पडेल ही धरण

रानोमाळ सैरभैर होतील जीव हे वनी

जाणा ओरबाडून घेणे वृत्ती असे दानवी

सांगावे कितीदा ही बात का असे नवी

वाचवा, जपा, जिरवा, अमूल्य जीवन जीवनी

साद घालते आर्त टाहो फोडूनी ही अवनी...

---------------

-ज्ञानेश्वर पंढरीनाथ फटांगरे

प्राथमिक शिक्षक

मु. पो. सारोळे पठार, ता. संगमनेर, जि. अहमदनगर