कोपरगाव : तालुक्यातील रवंदे व टाकळी परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात शासन दरबारी सतत पाठपुरावा करुन २०१९ - २०मधील अर्थसंकल्पात येथील रस्ता मंजूर करुन घेतला आहे. त्यामुळे याचे श्रेय इतरांनी घेऊ नये, असे भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष वैशाली साळुंके यांनी सांगितले.
साळुंके म्हणाल्या, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गेल्या १० वर्षांपासूनचा रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा असून, या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधीच मिळालेला नाही. मतदार संघातील रस्त्यांसाठी माजी आमदार कोल्हे यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. रवंदे व टाकळी येथील रस्त्याच्या कामालाही त्यांच्याच पाठपुराव्यातून निधी मिळाला आहे. त्यामुळे याचे श्रेय इतर कोणीही घेऊ नये.