-----------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने रेल्वेस्टेशन, बसस्थानकातील प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम उघडली असून, आठ हजार प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. नगर शहरातील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. महापालिकेने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवाशांच्या चाचणीची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील रेल्वेस्टेशनसह सर्व बसस्थानकांमध्ये येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत ७ हजार ९९६ प्रवाशांची चाचणी करण्यात आली. यापैकी ७ प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील पारनेर व संगमनेर तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हाभरातून नागरिक शहरात येतात. तसेच अन्य जिल्ह्यांतूनही नागरिक नगर शहरात येत असून, त्यांची चाचणी करण्यात येत आहे. याशिवाय शहरातील गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सध्या मंगल कार्यालयांत लग्नासाठी मोठी गर्दी होत आहे. गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत असून, मंगल कार्यालयातील नागरिकांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
.....
अशी केली तपासणी
रेल्वेस्टेशन- ६ हजार २३४
माळीवाडा बसस्थानक- १ हजार ३९५
तारकपूर- ३६७