याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील भास्कर कारभारी गायकवाड यांनी ॲड. सुरेंद्र जानराव यांच्यामार्फत संगमनेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. जिल्हा न्यायाधीश (क्र. २) भोसले यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली.
याचिकाकर्ते यांची तिगाव येथे वडिलोपार्जित शेतजमीन व जनावरे आहेत. ते नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. नोकरी सांभाळून ते गावाकडील शेती करतात. शेजारी राहणाऱ्या लोकांनी गायकवाड यांच्या शेतीवर कब्जा केल्याच्या प्रकरणात संगमनेर न्यायालयात दिवाणी दावा सुरू आहे. या जमिनीतील गायकवाड यांचा हिस्सा वगळून इतर मिळकतीबाबत हा दावा सुरू आहे. गायकवाड यांनी त्यांच्या हिश्श्याच्या जमिनीत जनावरांसाठी मका पेरला होता. ज्यांच्या विरोधात दावा सुरू आहे, त्या लोकांनी गायकवाड यांच्या शेतातील मका कापून नेला. याबाबत गायकवाड हे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र, त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यानंतर गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन दाद मागितली. मात्र, कुणीच त्यांची दखल घेतली नाही. त्यानंतर गायकवाड यांनी ॲड. जानराव यांच्यामार्फत संगमनेर न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेतील प्रतिवादींना नोटीस काढताना न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या विविध निकालांचा संदर्भ दिला असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. जानराव यांनी सांगितले.
----------------------------
कुठल्याही तक्रारदाराची फिर्याद दाखल करून घ्यावी, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. याचिकाकर्ते भास्कर गायकवाड यांच्या शेतातील पीक चोरीबाबत मात्र पोलिसांनी फिर्याद दाखल करून न घेतल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व इतरांविरोधात अवमान याचिका दाखल करून घेत त्यांना नोटीस काढली आहे.
- ॲड. सुरेंद्र जानराव, याचिकाकर्त्याचे वकील