अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने हे आंदोलन घोषित करण्यात आले असून, यामध्ये पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागृक नागरिक मंच, हरदिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाउंडेशन, फिनिक्स सोशल फाउंडेशन संघटना सहभागी होणार आहे. नगर शहरातील औद्योगिक, व्यापार, रोजगार व विकासाला चालना देण्यासाठी मागील दहा वर्षांपासून सत्याग्रही व स्वयंसेवी संघटनेची पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने सुरू आहे. रेल्वे विभागाने दौंड येथे ३० कोटी रुपये खर्च करून कॉडलाइनचे काम पूर्ण केले. कॉडलाइनचे काम पूर्ण झाल्याने रेल्वे दौंड स्टेशनवर इंजन बदलण्यासाठी न थांबता दोन तासात पुण्याला पोहोचणार आहे. ही रेल्वेसेवा नगरकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ही रेल्वेसेवा सुरू न केल्यास रेल्वे रोको करण्याच्या इशार्याचे निवेदन रेल्वे अधिकार्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पाठविण्यात आले. हा प्रश्न रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्गी लावण्यासाठी स्वयंसेवी संघटनांचे शिष्टमंडळ खासदार डॉ. सुजय विखे यांची भेट घेणार आहे.
या बैठकीत रेल्वे स्टेशनचे प्रभारी स्टेशन मास्तर श्रीकांत परिडा, वाणिज्य निरीक्षक एल. जी. महाजन, रामेश्वर मीना, स्वयंसेवी संघटनेचे हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अॅड. कारभारी गवळी, सुहास मुळे, जालिंदर बोरुडे, संजय सपकाळ, रमेश बाफना, धनेश बोगावत, ए. बी. बोरा, दत्तात्रय गायकवाड, अन्वर सय्यद, हुसेन सय्यद, जयकुमार मुनोत, राजेंद्र पडोळे, कैलास दळवी, बहिरूनाथ खंडागळे, जयराम मल्लिकार्जुन, सुवालाल ललवाणी आदी उपस्थित होते.