नगरपरिषदेत पाच नगरसेवक प्रथमच निवडून आलेले आहेत. या पंचवार्षिकमधील राहिलेल्या महिन्यांचे समान वाटप करत सर्वांना दहा-दहा महिने संधी देण्यात येत आहेत. रमेश लाढाणे यांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. मनीषा लांडे, संग्राम घोडके, ज्योती खेडकर व दिपाली औटी यांची नावे उपनगराध्यक्षपदासाठी आघाडीवर होती. या चारही जणांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. बबनराव पाचपुते यांनी चारपैकी एक चिठ्ठी उचलली अन् उपनगराध्यक्षपदाची माळ मनीषा लांडे यांच्या गळ्यात पडली.
त्यानंतर भाजपकडून मनीषा लांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. काँग्रेस आघाडीकडून संतोष पोपटराव कोथिंबिरे यांनी अर्ज दाखल केला. मात्र अपुऱ्या संख्याबळाचा विचार करता कोंथिबिरे यांनी माघार घेतली आणि लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.