लोकसाहित्याचे अभ्यासक स्व. गंगाधर मोरजे यांच्या स्मरणार्थ गेल्या दहा वर्षांपासून उत्कृष्ट कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रह, समीक्षात्मक ग्रंथाला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दिले जातात. आतापर्यंत राज्यातील ख्यातनाम साहित्यिकांच्या कलाकृतींना पुरस्कार देण्यात आले आहेत. सन २०२१ या वर्षासाठी प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांच्या ‘साहित्य संशोधन : वाटा आणि वळणे’ या ग्रंथाला उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ पुरस्कार, तर पत्रकार अशोक निंबाळकर यांच्या ‘माहेलका’ या कादंबरीला, सोलापूर येथील कवयित्री डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण यांच्या ‘लोकमायचं देणं’ कविता संग्रहाला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिंडोरी (जि. नाशिक) येथील विजयकुमार मिठे यांचा ‘मातीमळण’ व अमरावती येथील डॉ. गिरीश खारकर यांच्या ‘अबोल अश्रू’ या दोन कथासंग्रहाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लक्ष्मण विठ्ठल ऐतलवाड यांना समाज गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुरस्कार वितरण कार्यक्रम स्थगित केला असून पुढील वर्षी ९ जुलै रोजी पुरस्कार वितरण करण्यात येईल, अशी माहिती पद्मगंगा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. धोंडिराम वाडकर, उपाध्यक्ष पत्रकार मिलिंद चवंडके यांनी दिली.
-------
फोटो - १० साहित्य पुरस्कार