कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण भागात सुरू असलेल्या चोर्यांच्या सत्राने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चोरट्यांपासून बचाव करण्यासाठी कुळधरण गावामध्ये पंधरा ते वीस जणांची आठ तर प्रत्येक वस्तीनिहाय प्रत्येकी एक किंवा दोन अशी गस्ती पथके सध्या कार्यान्वित आहेत. गस्ती पथकातील युवक रात्रभर गस्त घालतात. चोरट्यांच्या भीतीने घरच्या महिलांचीही झोपच उडाल्याने रात्री जागरण आणि दिवसा सामसूम असे सध्या येथील चित्र आहे. गेल्या सहा दिवसात घरफोड्या व रस्ता लुटीच्या चार घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. युवकांची पथके गावात चौफुला, जगदंबा मंदिर परिसर, रोहिदासनगर, विद्यालय परिसर आदी भागात गस्त घालतात. वस्त्यांवरील चित्र निराळे आहे. कोपर्डी मार्गालगत तसेच जंगलाच्या आसपास असलेल्या सुपेकर, वारे, जगताप, गुंड या वस्त्यांवरील लोक सायंकाळी सात वाजताच जेवण आटोपून झोपण्यासाठी एकत्र येतात. रात्रभर एकमेकांच्या वस्त्यांवर तसेच गावात संपर्क सुरूच असतो. दूरवर आडवळणी शेतात जाणेही शेतकर्यांनी बंद केले आहे. जवळच्या शेतातूनही महिला चोरांच्या भीतीमुळे लवकरच घरी परतात. (वार्ताहर)
पोपट सुपेकर यांच्या बंगल्यावर गुरुवारी रात्री पडलेल्या दरोडा प्रकरणी अटक केलेल्या दोघा जणांनी अजुनही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. कुळधरण परिसरातील सर्व वस्त्यांवर ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल. -नितीन चव्हाण, पोलीस निरीक्षक,
कर्जत रोजच चोर्याच्या घटना घडत आहेत. आमची वस्ती कोपर्डी जंगलापासून हाकेच्या अंतरावर आहे. अंधार पडताच भीती वाटते. पोलिसांच्या गस्तीची गाडी वस्त्यांवर येत नाही. पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावे. -शुभांगी जगताप कोपर्डी रोड, कुळधरण