बुधवारी दुपारी राजूर पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करत असताना राजूर पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांची तपासणी केली होती. यात या मालाची वाहतूक करत असताना आवश्यक असणारी कागदपत्रे वाहनचालकांकडे नसल्याने पोलिसांनी ती ताब्यात घेतली होती. गुरुवारी उशिरापर्यंत तहसील कार्यालयाकडून आवश्यक माहिती उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी या चार वाहनचालकांना ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांना अटक केली होती. तहसीलदार यांच्याकडून पुन्हा आवश्यक माहितीबाबत लेखी मागणी करण्यात आली.
शुक्रवारी वाहनचालक हौशीराम दिनकर देशमुख, साई संदेश धुमाळ, चालक योगेश राजेंद्र धुमाळ आणि चालक अशोक हिरामण देशमुख या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सुरू असल्याचे सपोनि साबळे आणि पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी सांगितले.
दरम्यान, पेसा ग्रामपंचायत सरपंच परिषदेच्या वतीने माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.