अशोक निंबाळकर, अहमदनगर व्यवसाय शिक्षण (आयटीआय) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेता येईल. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आयटीआयला दोन वर्षांची समकक्षता म्हणून मान्यता दिली आहे. या अध्यादेशाची पुणे विद्यापीठ यावर्षीपासून अंमलबजावणी करीत आहे. यामुळे लाखो विद्यार्थी पदवीधर होतील.सध्या बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे आयटीआय विद्यार्थ्यांना या वर्षीपासूनच पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेता येईल. आयटी आय-ला दोन वर्षांच्या समकक्षतेसाठी शासनाने संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नेमली होती. तिने या निर्णयासाठी अहवाल सादर केला. या समितीने विविध अभ्यासक्रमांना समकक्षता तसेच पर्यायी शैक्षणिक अर्हता दिल्याने विद्यार्थ्यांना होणारे फायदे, विविध राज्यांनी अर्हतेबाबत निर्गमित केलेले आदेश, व्यवसाय शिक्षणाबाबत विविध समितींनी केलेल्या शिफारशी आदी बाबींचा सर्वंकष अभ्यास करून अर्हतेबाबत अहवाल सादर केला. राज्य सरकारने व्यवसाय शिक्षणाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगार वर्गाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी व्यवसाय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी वरीलप्रमाणे निर्णय घेतला.पूर्वी आयटीआयनंतर त्यांना १७ क्रमांकाचा अर्ज भरून बारावीची परीक्षा द्यावी लागे. त्यात अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थी शिक्षणापासून परावृत्त होत. या समतुल्यमुळे विद्यार्थ्यांना थेट पदवीच्या पहिल्या वर्षांसाठी (कोणतीही शाखा) प्रवेश घेता येईल. प्रवेश देण्याबाबत पुणे विद्यापीठाला आदेश मिळाले आहेत, असे पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य शिवाजीराव साबळे यांनी सांगितले.
आयटीआयनंतर आता थेट पदवीसाठी प्रवेश!
By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST