काष्टी(जि.अहमदनगर) : वाळवा साखर कारखान्यावरून धुळ्याकडे ऊस तोडणी मजुरांना घेऊन टेम्पो एका उभ्या टेम्पो व डीपीला धडकला. या अपघातात दोन ऊस तोडणी महिला जागीच ठार झाल्या आहेत. अहमदनगर-दौंडमहामार्गावरील काष्टी येथील पाचपुतेवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मंदाबाई मच्छिंद्र बोरसे (वय ४०) वैशाली शिवाजी भिल (वय २०) दोघी (रा. नठाणे, ता. सिंदखेडा, जि.धुळे) अशी अपघातातील मृत महिलांची नावे आहेत. या टेम्पोत १२ पुरुष, १२ महिला आणि १३ बालके होती. एम.पी.-८, जी.एच.-३८८८ या क्रमांकाच्या टेम्पोमधून ऊस तोडणीचा हंगाम आटोपून हे सर्व ऊसतोडणी मजूर धुळे जात होते. त्यांचा टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने काष्टी शिवारातील पाचपुते वाडीजवळ एम. एच. -१६, ए.वाय.९७७५ क्रमांकाच्या उभ्या टेम्पोला पाठीमागून जाऊन धडकला.टेम्पोची एक बाजू कापून गेली आहे. यामध्ये वैशाली भिल व मंदाबाई बोरसे या महिला जागीच ठार झाल्या. अपघाताची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सहायक फौजदार भानुदास नवले यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली.
काष्टीजवळ धुळ्याच्या ऊस तोडणी मजुरांच्या टेम्पोला अपघात; दोन महिला ठार; २१ जण बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:45 IST