अहमदनगर: परतीच्या मान्सूनने जिल्ह्यातील चित्र पालटले आहे़ मात्र, दुष्काळ दूर झाला असला तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या असून, त्यादृष्टीने मोठे प्रकल्प, छोटे तलाव आणि बंधाऱ्यावर प्रशासनाचे लक्ष राहील़ तसेच ग्रामसभेत पाणी व चाऱ्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पत्रकारांना दिली़मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुष्काळी जिल्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला़ या बैठकीनंतर कवडे पत्रकारांशी बोलत होते़ मागील आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाली होती़ मात्र, गेल्या वीस दिवसांत झालेल्या पावसाने चित्र पालटले आहे़ या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नगर जिल्ह्यातील पाऊस, चारा, टँकर आणि वाढलेले पाणीसाठे, याची माहिती देण्यात आली़ इतर जिल्ह्यांतील स्थिती समाधानकारक असल्याचे यानिमित्ताने समोर आल्याचे कवडे यांनी सांगितले़ पावसामुळे दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे़ परतीच्या मान्सूनने दुष्काळग्रस्त तालुक्यांत दमदार हजेरी लावली़ टँकरची संख्या घटली़ दक्षिण नगर जिल्ह्यातील उद्भवही ओसंडून वाहू लागले आहेत़ रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होईल़ पण, पुन्हा पूर्वीप्रमाणे स्थिती निर्माण होणार नाही, यावर बैठकीत चर्चा झाली़ कमीत कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केले जाईल़ मोठ्या प्रकल्पांतील पाण्याचा गैरवापर होणार नाही, यासाठी महावितरण, पोलीस, महसूल आणि कृषी विभागांना आदेश देण्यात आले आहेत़ वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. येत्या २ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील पाणी व चाऱ्याचे नियोजन केले जाईल़ ग्रामसभेसाठी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहतील़ जनावरांच्या चाऱ्यासाठी योग्य प्रयत्न केले जातील़ रब्बी हंगामात जवळपास ६५० हेक्टरवर ज्वारीचे पिक घेतले जाईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे़ चारा उपलब्ध होणार असल्याने चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वास कवडे यांनी यावेळी व्यक्त केला़
पाणीसाठ्यांबाबत सरकार दक्ष
By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST