अहमदनगर : समाजकल्याण विभागाच्यावतीने राजर्षी शाहू छत्रपती शिष्यवृत्ती योजना दोन प्रकारात राबवण्यात येते. या योजनेत गतवर्षी २ हजार ६३२ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार आणि अकरावी आणि बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेतून अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे.समाजकल्याण विभाग (राज्य सरकार) यांच्या मार्फत राजर्षी शाहू छत्रपती शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. दोन प्रकारात राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी स्वतंत्र पध्दतीने प्रस्ताव दाखल करणे गरजेचे असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. २००५ पासून ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. मात्र, लाभार्थ्यांना मिळालेल्या लाभाची माहिती २०१३ पासून आॅनलाईन करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न आणि मर्यादेचे बंधन नसल्याने जास्त संख्या असली तरी त्याचा लाभ देता येतो, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक माधव वाघ यांनी सांगितले. गत वर्षी गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ जिल्ह्यातील अकरावी व बारावीच्या २ हजार ४२० विद्यार्थ्यांना तर गुणवत्ता पुरस्काराचा लाभ २१२ विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. शिष्यवृत्तीसाठी संबंधित विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज तर पुरस्कारासाठी शाळेला विद्यार्थ्याचा प्रस्ताव तयार करून समाजकल्याण विभागाकडे सादर करावा लागतो, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)गुणवत्ता पुरस्कार योजनेचा लाभ एससी, एसटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळतो. यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार रुपयांचा लाभ तर शिष्यवृत्ती योजनेत दर महिन्याला ३०० रुपयेप्रमाणे वर्षाला ३ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
अडीच हजार विद्यार्थ्यांनी घेतला शिष्यवृत्तीचा लाभ
By admin | Updated: May 6, 2016 18:40 IST