वाशिम : पाणीटंचाई निवारण योजना ठरताहेत ‘तकलादू’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 17:10 IST2017-12-14T17:08:36+5:302017-12-14T17:10:43+5:30
मालेगाव (वाशिम): शहरासह तालुक्यात दरवर्षीच्या हिवाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. त्यानुसार, पाणीटंचाई उपाययोजनांच्या आढावा बैठका होऊन टंचाई निवारणार्थ लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तकलादू स्वरूपातील या उपाययोजनांमुळे तात्पुरता दिलासा मिळत असून पाणीटंचाईच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज भासत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

वाशिम : पाणीटंचाई निवारण योजना ठरताहेत ‘तकलादू’!
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): शहरासह तालुक्यात दरवर्षीच्या हिवाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. त्यानुसार, पाणीटंचाई उपाययोजनांच्या आढावा बैठका होऊन टंचाई निवारणार्थ लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तकलादू स्वरूपातील या उपाययोजनांमुळे तात्पुरता दिलासा मिळत असून पाणीटंचाईच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज भासत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
पाणीटंचाई निवारणसंदर्भात दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आढावा बैठक घेवून विहीर अधिग्रहण, हातपंप दुरुस्तीची कामे केली जातात. याऊपरही अनेक गावांमधील नागरिकांवर दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचायत समिती स्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, चालूवर्षी ४२ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार आहे. पाणीटंचाईचे हे प्राथमिक स्वरूप लक्षात घेऊन प्रशासनामार्फत उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्या तात्पुरत्या न ठेवता कायमस्वरूपी असाव्यात, अशी मागणी तालुक्यात होत आहे.
पाणीपुरवठा योजनांची कामे अर्धवट स्थितीत!
मालेगाव तालुक्यात आदिवासी बहुल भागात विकास उपाययोजनांतर्गत पाणीपुरवठ्याची ८ कामे मंजूर असून त्यापैकी केवळ २ कामे पूर्ण झाली आहेत. माळेगाव आणि किन्ही या गावांमध्ये जलकुंभ उभारण्याचे काम सुरू असून धरमवाडी, वाकळवाडी, भौरद उमरवाडी आणि खैरखेडा येथे काम अद्याप जलकुंभ उभारण्यास सुरूवात झालेली नाही. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केवळ शिरपूरचे काम पूर्ण झाले आहे. अमानी येथे वीज जोडणीअभावी पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चाकातिर्थवरून कुरळा धरणात पाणी सोडणे गरजेचे!
पुर्वी ग्रामपंचायत असलेल्या मालेगावला आता नगर पंचायतीचा दर्जा मिळालेला आहे. असे असताना अद्याप शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. कुरळा धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो; परंतु तो फार काळ पुरणार नाही. त्यामुळे चाकातिर्थवरून कुरळा धरणात पाणी सोडल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे. त्यासाठी नगर पंचायतीने सक्रीय पुढाकार घेणे आवश्यक आहे.