ठाणे-पालघरचे दोन हजार खटले निकाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:36 AM2019-07-15T00:36:00+5:302019-07-15T00:36:07+5:30

विविध प्रकरणांत दाखल होणारे आणि प्रलंबित (जुने) असलेले अशा ३२ हजार खटल्यांपैकी दोन हजार खटले ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत मार्गी लागले आहेत.

Thane-Palghar has two thousand cases pending | ठाणे-पालघरचे दोन हजार खटले निकाली

ठाणे-पालघरचे दोन हजार खटले निकाली

Next

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील विविध प्रकरणांत दाखल होणारे आणि प्रलंबित (जुने) असलेले अशा ३२ हजार खटल्यांपैकी दोन हजार खटले ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत मार्गी लागले आहेत. या खटल्यांतील तक्रारदारांना तडजोड भरपाईपोटी एकूण २६ कोटी एक लाख ९७ हजारांची रक्कम मिळाली आहे. यामध्ये ठाणे तालुक्यातील निकाली लागलेल्या ६३१ तक्रारदारांना साडेसोळा कोटी रुपये भरपाईपोटी मिळाले आहेत. तर, वसईत सर्वाधिक ९,३९९ खटले लोकअदालतीसमोर आले होते. यामध्ये दाखल होण्यापूर्वीचे आठ हजार २५६ तर जुने एक हजार १४३ खटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १२ तालुक्यांतील विविध १३ प्रकारांमधील खटले दाखल होण्यापूर्वीचे २० हजार ६००, तर जुने एक हजार ९३ असे ३१ हजार ८३५ खटले शनिवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीसमोर आले होते. त्यापैकी ८६८ खटले दाखल होण्यापूर्वीचे आणि एक हजार ९६१ खटले हे जुन्या खटल्यांपैकी निकाली निघाले. तसेच निकाली निघालेल्या ८६८ खटल्यांमध्ये दोन कोटी ३९ लाख आठ हजार ४९८.५२ इतकी, तर एक हजार ९३ खटल्यांमध्ये २३ कोटी ६२ लाख ८८ हजार १७५ इतकी भरपाईपोटी रक्कम दिली आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त प्रकरणे ठाणे तालुक्यातील असून निकाली निघालेल्या खटल्यातील येथील तक्रारदारांनाच सर्वाधिक १६ कोटी ४९ लाख २४ हजार ७०० रुपयांची रक्कम तडजोडभरपाई मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन.आर.बोरकर यांच्या उपस्थितीत धनादेश दिले.
>अपघातातील मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई
रस्ता अपघातात मृत्यू झालेले बीएसएनएलचे अभियंता दादाहरी मच्छिंद्र चंदनशिवे (४५) यांचे कुटुंब आणि इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीत सुरू असलेला दावा शनिवारी राष्टÑीय लोकअदालतीत निकाली काढण्यात आला. चंदनशिवे यांच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई देण्याचा निकाल दिला. त्यानंतर, इन्शुरन्स कंपनीने त्या रकमेचा धनादेश चंदनशिवे यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. यावेळी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन.आर. बोरकर, जिल्हा न्यायाधीश (१) डी.जी. मुरूमकर, मोटार अपघात दावा न्यायालयाचे सदस्य आर.एन. रोकडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एम.आर. देशपांडे, इफकोचे उपाध्यक्ष सनी भंडारी, मॅनेजर प्रदीप हे उपस्थित होते. लोकअदालतीमध्ये शनिवारी विविध प्रकरणांतील सुमारे दोन हजार दावे १४ पॅनलद्वारे निकाली काढण्यात आले. ठाण्यातील कळवा-चिंचपाडा येथे राहणारे दादाहरी चंदनशिवे (४५) हे बीएसएनएलमध्ये उपविभागीय अभियंता होते. मृत्यूसमयी त्यांना दरमहा ८९ हजार २३१ रुपये वेतन मिळत होते. दादाहरी हे पत्नी आणि मुलीसोबत उस्मानाबाद येथून ठाण्यात गाडीने येत होते. त्यांची गाडी मुरबाडच्या टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण-नगर रोडवर आली असता नो-एण्ट्रीमधून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर इन्शुरन्स कंपनीने भरपाईसाठी केलेल्या हिशेबात त्याच्या मासिक मिळकतीचा चौथा भाग देण्याचे निश्चित केले. मात्र, मासिक मिळकतीच्या हिशेबाने कुटुंबीयांनी एक कोटी ७५ लाखांच्या भरपाईचा दावा केला होता. लोकअदालतीत चंदनशिवे कुटुंबीयांच्या वतीने सुरेंद्र सोनावणे यांनी, तर इन्शुरन्स कंपनीतर्फे अरविंद तिवारी यांनी युक्तिवाद केला. थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि न्यायालयीन प्रक्रि येमुळे समझोत्याला विलंब होतो. अपघातात मृत्यू झालेल्या अभियंत्याच्या कुटुंबाला सव्वा कोटी भरपाई : एमएसआरटीसीने (एसटी) सचिन घाणेकर या मरीन अभियंत्याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी तब्बल सव्वा कोटी भरपाई देण्याबाबत समझोता केला. २८ डिसेंबर २०१४ रोजी पनवेलमधील टक्कानाका येथे जात असताना एसटी आणि ट्रकच्या अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी घाणेकर यांच्या कुटुंबीयांनी मोटार वाहन विमा प्राधिकरणाकडे दोन कोटींच्या भरपाईचा दावा केला होता.
>राष्टÑीय लोकअदालतीमधील निकाली तक्ता
तालुका एकूण खटले निकाली खटले भरपाईपोटीची रक्कम
ठाणे ५१७१ ६३१ १६४९२४७००
नवी मुंबई ४७३० १२३ १८८५५,२४३
भिवंडी १६६७ ११० १२२३९५१५
उल्हासनगर २८८२ ७१ २०८३४५.५२
पालघर ११८४ ६९ १४७८९७५६
जव्हार १८४ १८ १७८८४०७
वाडा १५३२ १५७ ५५६९९८४
डहाणू ९३६ १८५ १८७५८३८
शहापूर ३८८ २८ १३६३००
वसई ९३९९ ३३० १४३०५१४३
कल्याण ३३७८ २१७ २३९८१५९७
मुरबाड ३८४ २२ ५२१८४५
एकूण ३१,८३५ १९६१ २६,०१,९६,६७३.५२
>मोटार अपघाताच्या १७४ प्रकरणांचा लागला निकाल
या लोकअदालतमध्ये मोटार अपघाताची ३२१ प्रकरणे न्यायालयासमोर आली होती. त्यापैकी १७४ प्रकरणांचा निकाल देण्यात आला. त्यात तडजोडीत १२ कोटी ६९ लाख ३० हजार ९३६ रुपयांची रक्कम नुकसानभरपाई मिळाली आहे.

Web Title: Thane-Palghar has two thousand cases pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.