कोयना @ ५० टीएमसी, इतर धरणांतही साठा वाढला, पश्चिम भागात पावसाचा जोर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:32 IST2018-07-11T13:28:09+5:302018-07-11T13:32:11+5:30
सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेमध्ये जवळपास ५० टीएमसी इतका साठा झाला होता. तर जिल्ह्यातील इतर धरणातही पाण्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात साठा झाला आहे.

कोयना @ ५० टीएमसी, इतर धरणांतही साठा वाढला, पश्चिम भागात पावसाचा जोर कायम
सातारा : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेमध्ये जवळपास ५० टीएमसी इतका साठा झाला होता. तर जिल्ह्यातील इतर धरणातही पाण्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात साठा झाला आहे.
जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावल्यानंतर काही दिवसांची उघडीप वगळता पाऊस सतत होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून पश्चिम भागात सूर्यदर्शन झालेच नाही. सतत जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळू लागले आहेत. धरणातही पाण्याची आवक वाढली असून, साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा धरणात अधिक साठा आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८६ तर एकूण १८५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात ४९.८२ टीएमसी इतका साठा आहे. २४ तासांत धरणात ३८६७० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. धोम धरण क्षेत्रात १३, कण्हेर १३, बलकवडी ५८, उरमोडी २० आणि तारळी येथे ३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सातारा शहरातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना छत्री हातात घेऊन बाहेर पडावे लागले.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम १३ (१३३)
कोयना ८६ (१८५३)
बलकवडी ५८ (८८३)
कण्हेर १३ (२९८ )
उरमोडी २० (३७१)
तारळी ३१(६१३)