पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देणार, खासदार सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:55 AM2019-06-26T01:55:33+5:302019-06-26T01:55:48+5:30

जिल्ह्यांत पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’च्या खासदार कट्टा कार्यक्रमात सांगितले.

will promote tourism and complementary industries - Sunil Tatkare | पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देणार, खासदार सुनील तटकरे

पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देणार, खासदार सुनील तटकरे

Next

नवी दिल्ली : निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारा आणि पर्यटकांच्या गर्दी$साठी ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात आजही अनेक प्रश्न आहेत. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, गुहागर या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे या जिल्ह्यांत पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’च्या खासदार कट्टा कार्यक्रमात सांगितले. या वेळी त्यांनी महामार्ग, रेल्वे, रोजगार या मुद्द्यांचाही उल्लेख केला.

प्रश्न : पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करणार?
उत्तर : पर्यटनावर आधारित असलेल्या अनेक बाबींना चालना द्यावी लागणार आहे. रायगड किल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा हुंकार दिलेले महाड येथील चवदार तळे, डॉ. आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे मंडणगड तालुक्यात आहे, या ठिकाणांचा विकास करायचा आहे. महर्षी कर्वे, विनोबा भावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन भारतरत्न कोकणात जन्माला आले, त्यांचे एकत्रित राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा संकल्प आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, गुहाघर येथे पर्यटनाच्या पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.

प्रश्न : कोणते प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार?
उत्तर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला मुद्दा आहे. कोकण, गोवा, कर्नाटक, केरळकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचे काम करायचे आहे. अर्थमंत्री असताना एका पुलासाठी २५० कोटीं निधी दिला होता. रत्नागिरी, रायगडचा पालकमंत्री असताना सात-आठ पूल पूर्ण बांधून घेतले होते. हा सागरी महामार्ग पूर्ण करणे म्हणजे पर्यटनाची निर्मिती आहे.

प्रश्न : कोकण रेल्वेच्या समस्येबाबत...
उत्तर : कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत. डबल ट्रॅकिंग, विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. दूर पल्ल्याच्या गाड्यांना कोकणातील विविध भागांत थांबे मिळायला हवेत. खूप बोगदे, मोठ्या नद्यांवरील पूल असा हा रेल्वेमार्ग आहे. रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत.

प्रश्न : बीएसएनएलच्या सेवा खंडित झाली आहे..?
उत्तर : बीएसएनएलची खेड्यातील सेवा बंद असणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे गावांतील अनेक सरकारी कामे रखडली आहेत. बीएसएनएलकडे पैसे नसल्यामुळे महावितरणकडून त्यांची वीजजोडणी कापण्यात येते. बीएसएनएल हा केंद्राचा महत्त्वाचा उपक्रम असून त्याची सेवा आवश्यक आहे. या प्रश्नाबाबतही पाठपुरावा करावा लागणार आहे.

प्रश्न : कोकणातून स्थलांतर का वाढत आहे?
उत्तर : सुरुवातीला कोकणी माणसाने कापड गिरण्यांमध्ये नोकरीसाठी मुंबईची वाट धरली. मुंबईच्या मनी आॅर्डरवर कोकणी माणूस अवलंबून राहिला. आताही कोकणातील २५ ते ३० टक्के घरे बंद आहेत. त्यामुळे पर्यटनावर आधारित रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. फळप्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. राज्यात मंत्री असताना नारळ, काजू यांच्यावर प्रक्रियेसाठी भागभांडवल देण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व दिले जाईल.

प्रश्न : आदिवासी समाजाचे प्रश्न..?
उत्तर : कोकणातील आदिवासी आता शिकतोय, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. या समाजाला पायाभूत सुविधा देण्यास प्राधान्य असेल. कोकणात वाड्या दूर दूर अंतरावर असतात. या वाड्या जोडण्यासाठी पालकमंत्री असताना वाडीजोड रस्ते हा उपक्रम राबवला होता. या भागात केंद्र सरकारचा निधी नेण्याचा प्रयत्न करेन.

प्रश्न : महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत ?
उत्तर : महाराष्ट्रात दुष्काळाची समस्या गंभीर आहे. गेल्या वर्षी रब्बीचे पीक गेले. आताही खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातही दुष्काळी भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने ज्या योजना आखल्या आहेत, त्या महाराष्ट्रात नेण्याचा प्रयत्न आहे. गडकरींकडे जलसंधारण असताना त्यांनी याबाबत घोषणाही केल्या होत्या. नदीजोड प्रकल्पांद्वारे पाण्याची समस्या संपवण्याबाबत त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. आता या प्रश्नाची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मदत होणार आहे.

प्रश्न : कोकणात येणा-या विनाशकारी प्रकल्पांबाबत..?
उत्तर : कोकणाला खाडी जवळ असल्यामुळे रायगड आणि रत्नागिरीमध्ये रासायनिक प्रक्रिया करणारे उद्योग आले. पाताळगंगा, पेण, रोहा, महाड या सर्व एमआयडीसींमध्ये रासायनिक कारखाने आले. त्यामुळे आता रासायनिक कारखाने नकोत, अशीच आमची भूमिका आहे. आता दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोरमध्ये सेवा क्षेत्र, आॅटोमोबाइल, आयटी या क्षेत्राला प्राधान्य द्यायला हवे. प्रदूषणविरहित कारखाने आणणे आणि पर्यटनावर आधारित उद्योगधंदे सुरू केल्यास रोजगार मिळू शकतो.

Web Title: will promote tourism and complementary industries - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.