बालगंधर्व रंगमंदिर बंद ठेवू नका, नाट्यव्यवसाय धोक्यात येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:05 IST2018-03-16T00:05:12+5:302018-03-16T00:05:12+5:30

सध्या नाट्यव्यवसायाची परिस्थिती गंभीर आहे. केवळ बालगंधर्व आहे म्हणून पुण्यात बाहेरगावचे (मुख्यत: मुंबईच्या निर्मितीसंस्था) प्रयोग होत असतात.

Do not keep the Balgandharsh Rangamand close, drama business will be in danger | बालगंधर्व रंगमंदिर बंद ठेवू नका, नाट्यव्यवसाय धोक्यात येईल

बालगंधर्व रंगमंदिर बंद ठेवू नका, नाट्यव्यवसाय धोक्यात येईल

पुणे : सध्या नाट्यव्यवसायाची परिस्थिती गंभीर आहे. केवळ बालगंधर्व आहे म्हणून पुण्यात बाहेरगावचे (मुख्यत: मुंबईच्या निर्मितीसंस्था) प्रयोग होत असतात. हे हक्काचे ठिकाण नाहीसे झाले तर प्रयोग होणे बंद होईल आणि हे प्रयोग झाले नाहीत, तर पुण्यातल्या आणि बाहेरगावच्या नाट्यप्रयोगांची व्यवस्थाच धोक्यात येईल.
असंख्य कलाकारांचे तंत्रज्ञ-कारागरांचे अस्तित्वच नाहीसे होईल. नाट्यव्यवसायाच्या इतिहासातील तो काळा दिवस ठरेल. बालगंधर्व रंगमंदिराबद्दल नाट्यसृष्टीसह रसिकांच्या अतिशय नाजूक भावना आहेत. तेव्हा या रंगमंदिराला ‘हेरिटेज’ वास्तूचा दर्जा द्यावा. तसेच या वास्तुचा विस्तार किंवा नवनिर्माण सुलभ व्हावा. यासाठी नाट्यपरिषदेकडे कलाकार आणि तंत्रज्ञांची उपलब्धता आहे. या सेवेचा उपयोग करून घ्यावा, अशी आर्त साद घालत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने महापौरांना निवेदन दिले आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकासाची जाहीर घोषणा होताच नाट्यसृष्टीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ही वास्तू पाडण्याला रंगकर्मींनी विरोध दर्शविला. या वास्तूच्या पुनर्विकासाचा आराखडा अद्याप तयार झालेला नाही. महापौर आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने बालगंधर्वसंबंधी आपली निवेदनाद्वारे भूमिका विषद केली आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे आम्हा रंगकर्मींचेच नव्हे तर समस्त रसिकांचे प्रेमाचे आणि अभिमानाचे स्थळ आहे. देशातल्या सर्व कलाकारांना आपली कला इथे सादर करण्यात स्वत:चा सन्मान वाटतो.
कारण कै. नारायणराव राजहंस ज्यांना लोकमान्य टिळकांनी ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली. त्या महान कलाकाराचे हे स्मारक आहे. त्याच्या निर्मितीसाठी पु. ल. देशपांडे यांचे कष्ट आणि कल्पकता आहे. त्यामुळे नव्या अत्याधुनिक रंगमंदिराची निर्मिती इतर ठिकाणी करता येऊ शकते. पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे उद्यान येथे पुलंचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
व्यवस्थापनाची कार्यशाळा
नाट्यपरिषद विनामोबदला घेईल
शहरात अनेक नवीन रंगमंदिराची उभारणी झाली आहे. रंगमंदिराच्या दुरवस्थेबद्दल अनेकदा ओरड होते. रंगमंदिराची उत्तम व्यवस्था ठेवण्यासाठी नाटकाची जाण असणारे आणि आत्मीयता असणारे कर्मचारी असणे आवश्यक आहे. शाळा-कॉलेजात नाटकांत काम केलेले, रंगमंचामागील व्यवस्था सांभाळणारे, प्रकाशयोजना, ध्वनिसंयोजन हाताळलेले अशा कर्मचाऱ्यांचा एक वेगळा गट निर्माण करून त्यांच्या नेमणूका नाट्यगृहांवर करता येणे शक्य आहे.
कर्मचाºयांसाठी रंगमंदिर व्यवस्थापनाची कार्यशाळा नाट्यपरिषद विनामोबदला घेण्यास तयार आहे. तरी बालगंधर्व रंगमंदिरातील प्रयोग एक दिवस बंद राहाणार नाही, याची खबरदारी घेऊन जो विस्तारकार्यक्रम आखला जाईल, त्याला नाट्य परिषदेचा पाठिंबा असेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Do not keep the Balgandharsh Rangamand close, drama business will be in danger