रशिया-भारताची जवळीक रोखण्यासाठी अमेरिकेची नवी चाल; थेट मुंबईत धाडलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:18 PM2022-07-12T12:18:13+5:302022-07-12T12:21:01+5:30

युक्रेन युद्धामुळे रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अमेरिकेच्या महावाणिज्य दूतावासाने मुंबई बंदर प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रशियन मालवाहू जहाजांना मुंबई किनारपट्टीवर येऊ देऊ नये, असे या पत्रात म्हटले होते.

हे पत्र सुमारे १५ दिवसांपूर्वी लिहिले गेले होते आणि भारताला रशियन क्रूड ऑयल खरेदी करण्यापासून रोखण्याचा अमेरिकेचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. यूएस कॉन्सुलेट जनरलने मुंबई बंदर प्राधिकरणाला पत्र लिहिले

द प्रिंटच्या वृत्तानुसार, युक्रेन युद्धामुळे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र, यादरम्यान भारताचा रशियाशी व्यापार सुरूच आहे. भारताने कच्चे तेल आणि इतर मालाने भरलेल्या रशियन जहाजांना मुंबईच्या बंदरात प्रवेश करण्यास परवानगी दिली.

यूएस वाणिज्य दूतावासाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर, मुंबई बंदर प्राधिकरणाने बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था, शिपिंग महासंचालनालय (DGS) यांना पत्र लिहून पुढील कारवाईबाबत त्यांच्याकडून निर्देश मागितले.

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की,"आम्ही कोणत्याही जहाजाला किंवा मालवाहू जहाजाला परवानगी नाकारत नाही जोपर्यंत आम्हाला शिपिंग महासंचालनालय किंवा तटरक्षक दल यांसारख्या एजन्सीकडून सूचना मिळत नाहीत."

अधिकाऱ्याने सांगितले की, नियामक प्राधिकरण असल्याने डीजीएसला याबाबत निर्णय घ्यावा लागेल. मात्र, दरम्यान, डीजीएसने याबाबतचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयावर सोपवला आहे. शिपिंग महासंचालक अमिताभ कुमार म्हणाले की, आम्ही अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाचे पत्र परराष्ट्र मंत्रालयाला पाठवले असून याबाबत सूचना मागवल्या आहेत.

कुमार म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही देशाच्या जहाजाला भारतीय बंदरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. जर जहाजांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले आणि आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन केले नाही, तर त्यांची हालचाल अव्याहतपणे सुरू राहील.

भारताने रशियन तेल खरेदी केल्याने अमेरिका खूश नाही. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारत चीननंतर रशियन कच्च्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार बनला आहे. रशियन तेल मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर अमेरिका नाराज आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. ५ एप्रिल रोजी व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जे साकी म्हणाले होते की, रशियन तेल आणि इतर वस्तूंची आयात वाढवणे भारताच्या हिताचे आहे असे आम्हाला वाटत नाही.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे सल्लागार दलीप सिंग यांनीही रशियन तेल आयात करण्याबाबत भारताला इशारा दिला होता. पाश्चिमात्य देशांकडून टीका होत असतानाही भारत रशियन तेल खरेदी बंद करेल असं आतापर्यंत कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

भारताने युक्रेनमध्ये तात्काळ युद्धबंदीचे आवाहन केले असले तरी दुसरीकडे भारताचा रशियासोबतचा व्यापारही सुरूच आहे. युक्रेनवरील हल्ल्याप्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर रशियाचा निषेध करणाऱ्या ठरावावर मतदान करण्यापासून भारताने स्वतःला दूर केले होते.