BJP ने पाण्यासारखा पैसा ओतला! एका वर्षात निवडणूक प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च; रक्कम पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 09:48 AM2021-11-12T09:48:38+5:302021-11-12T09:54:12+5:30

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये BJP ने चांगलाच पैसा खर्च केल्याचे सांगितले जात आहे.

सन २०२१ च्या सुरुवातीला देशभरातील आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या ५ राज्यांत निवडणुकांचा धुरळा उडाला. यामध्ये अवघ्या जगाचे लक्ष पश्चिम बंगाल निवडणुकांकडे लागले होते. भाजपने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली होती.

मात्र, ममता बॅनर्जी यांनी भाजपला चितपट करत पुन्हा एका पश्चिम बंगालमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले. मात्र, या पाचही राज्यांच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी किती पैसे खर्च केले, याची आकडेवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.

या पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने चांगलाच पैसा खर्च केल्याचे सांगितले जात आहे. या आकडेवारीनुसार, भाजपने एकूण खर्च केलेल्या रकमेच्या जवळपास ६० टक्के पैसे तृणमूल काँग्रेस शासित राज्यात प्रचारासाठी वापरले.

निवडणूक पॅनेलला सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या विवरणानुसार, भाजपाने निवडणूक प्रचारासाठी २५२ कोटी २ लाख ७१ हजार ७५३ रुपये खर्च केले. यापैकी ४३.८१ कोटी आसाम निवडणुकीसाठी आणि ४ कोटी ७९ लाख रुपये पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी खर्च करण्यात आले.

तामिळनाडूमध्ये, जिथे द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) ने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी AIADMK कडून सत्ता हिसकावून घेतली, तिथे फक्त २.६ टक्के मते मिळविणाऱ्या भाजपाने प्रचारात २२ कोटी ९७ लाख रुपये खर्च केले.

भाजपाने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या विरोधात जोरदार प्रचार केला. भाजपने पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी १५१ कोटी खर्च केले. केरळमध्ये विद्यमान एलडीएफने सत्ता कायम राखली, तेथे भाजपने २९ कोटी २४ लाख खर्च केले. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली निवडणूक खर्चाची विवरणपत्रे निवडणूक आयोगाने आता सार्वजनिक केली आहेत.

तृणमूल काँग्रेसनेही आपला निवडणुकीचा ताळेबंद निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. यानुसार, तृणमूल काँग्रेसने भाजपपेक्षा अधिक पैसे या निवडणुकीसाठी खर्च केल्याचे पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने १५४ कोटी २८ लाख रुपये निवडणुकीसाठी खर्च केले.

यानंतर आता पुढील वर्षी पुन्हा एकदा पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश निवणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आताच्या घडीला उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. काही अंदाजांनुसार, भाजपला जागांमध्ये फटका बसला तर सत्ता राखण्यात योगी आदित्यनाथ यांना यश मिळेल, असे म्हटले जात आहे.

उत्तर प्रदेशनंतर पंजाबमधील निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण आताच्या घडीला पंजाबमधील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये फूट पडली असून, या निवडणुकीत जनता कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read in English