Lok Sabha Election 2024 Opinion Poll: राज्यात आज लोकसभा निवडणूक झाली तर, शिंदे गट जिंकेल की ठाकरे गट? धक्कादायक ओपिनिअन पोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 04:44 PM2022-07-29T16:44:53+5:302022-07-29T17:13:06+5:30

Lok Sabha Election 2024 Opinion Poll of Maharashtra: सर्व विरोधक एकत्र येऊन लढले तर भाजपाला ही लढाई काहीशी कठीण होईल. भाजपाच्या विरोधात वातावरण असण्याची शक्यता पाहून हा सर्व्हे करण्यात आला आहे. आता जर लोकसभा निवडणूक झाली तर कोणाचे सरकार बनेल?

जर आज लोकसभा निवडणूक लागली तर कोण जिंकेल, कोण हरेल हे आत्ताच सांगणे तसे कठीण नाही. विखुरलेला विरोधक आणि भाजपाची एकजुटता, आक्रमकता पाहता भाजपाच जिंकेल असे सारे म्हणतील. परंतू हे सारे युपीए लढणार की महाआघाडी यावर अवलंबून असणार आहे.

सर्व विरोधक एकत्र येऊन लढले तर भाजपाला ही लढाई काहीशी कठीण होईल. परंतू जर काँग्रेसच्या नेतृत्वात युपीए आणि जे काँग्रेसचे विरोधक आहेत ते महाआघाडीतून लढले तर मतांचे विभाजन झाल्याने भाजपाला जेवढ्या जागा जिंकण्याची आशा आहे, त्यापेक्षा जास्त जागांची लॉटरी लागणार हे नक्की.

विरोधकांचे अजून ठरलेले नसताना देखील इंडिया टीवी मॅटराइजने ओपिनिअन सर्व्हे केला आहे. कारण आता महागाई, पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी कहर मांडला आहे. यामुळे भाजपाच्या विरोधात वातावरण असण्याची शक्यता पाहून हा सर्व्हे करण्यात आला आहे. आता जर लोकसभा निवडणूक झाली तर कोणाचे सरकार बनेल?

गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा आहेत. त्यापैकी सर्वच जागा भाजपा जिंकेल असा लोकांचा कल आहे. मोदींच्या नावे भाजपाला ६१ टक्के मते मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला ३५ टक्के मते मिळताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात जेव्हा २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक झालेली तेव्हा भाजपाला २८ टक्के मते मिळालेली. जर आज निवडणूक झाली तर ३६ टक्के मतदान होईल. महाराष्ट्रात भाजपाची व्होटबँक वाढताना दिसत आहे. शिंदे गटाच्या खासदारांना २०१९ मध्ये ७ टक्के मतदान झाले होते. ते वाढून १७ टक्के होईल, असे दिसत आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. जर निवडणूक झाली तर २६ जागा भाजपाला मिळतील. तीन जागा उद्धव ठाकरेंच्या गटाला आणि शिंदे यांना ११ जागा मिळताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीला २०१९ मध्ये १६ टक्के मते मिळाली होती. ती वाढून १७ टक्क्यांवर येतील. सर्वाधिक नुकसान उद्धव ठाकरेंना होताना दिसत आहे, त्यांची मते तीन टक्केच राहणार आहेत.

महाराष्ट्रात आज लोकसभेची निवडणुक झाल्यास एकुण ४८ जागांपैकी भाजपाला २६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिंदे गटाला ११, राष्ट्रवादी काँग्रेसला ६, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ३ आणि काँग्रेसला २ जागा मिळू शकतात. भाजपाला ३६ टक्के मतदान, तर शिंदे गटाला ११ टक्के मतदान मिळण्याचा अंदाज इंडिया टीव्हीने केलेल्या सर्वेत दिसून येत आहे.