Mangal Shani Yuti : 'या' तीन राशींसाठी आगामी पंधरवडा खडतर काळाचा; पडणार मंगळ-शनीची वक्र दृष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 01:09 PM2022-05-02T13:09:56+5:302022-05-02T13:30:28+5:30

Mangal Shani Yuti : २९ एप्रिल रोजी शनीने मकर राशी सोडून कुंभ राशीत स्थलांतर केले आहे. त्याचबरोबर आता मंगळाचेही स्थलांतर झाल्यामुळे 'या' तीन राशींवर कठीण काळ ओढवणार असल्याची चिन्हं आहेत. शनी हा न्याय देणारा,शिस्त लावणारा ग्रह म्हणून परिचित आहे तर मंगळ हा सेनापती ग्रह अशी त्याची ओळख आहे. त्यामुळे या दोघांची युती म्हणजे सत्त्वपरीक्षेचा काळच!

बदलत्या ग्रहमानाचा परिणाम राशींवर होत असतो. त्यातही शनीचा राशीबदल हा सर्वांसाठी चिंतेचा विषय असतो. कारण शनीच्या स्थलांतरामुळे सर्व राशींवर बरे वाईट परिणाम होत असतात. अशीच आणखी एका ग्रहाच्या स्थित्यंतराबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या घडामोडीबद्दल ज्योतिष शास्त्राच्या वाचकांना उत्सुकता असते, तो म्हणजे मंगळ ग्रह!

शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाल्यापासून धनु राशीची साडेसाती संपली आणि कुंभ राशीची सुरू झाली आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सर्वच बाबतीत सावध पवित्रा घेणे त्यांना हितावह ठरू शकेल. शनी बरोबर मंगळाचे कुंभ राशीत आगमन म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी परिस्थिती!

या काळात कुंभ राशीच्या लोकांनी नवग्रह स्तोत्राचे नित्य पठण करावे. शनिवारी शनी मंदिर किंवा हनुमान मंदिरात जाऊन उडीद, तेल, शेंदूर आणि रुईच्या पानांचा हार शनी देवाला, तसेच हनुमंताला अर्पण करावा. यथाशक्ती दानधर्म करावा आणि चुकूनही अनैतिक कृत्य हातून घडणार नाही याची दक्षता घ्यावी.

आगामी पंधरवडा कर्क राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. शनी मंगळ युतीच्या प्रभावाने या राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल. कामात अपयश, अडथळे, प्रवासात अपघाताचे प्रसंग, किरकोळ आजारपण, आप्तेष्टांशी वाद इ समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सध्या तुम्ही जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करण्यातच खरी हुशारी ठरेल.

सध्या उन्हाळ्याचा त्रास आहेच. पण शनी मंगळ युतीच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना शारीरिक त्रासालाही सामोरे जावे लागू शकते. आरोग्याच्या तक्रारी किंवा जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या अन्यथा आरोग्याबरोबरच आर्थिक अडचणीदेखील उद्भवू शकतात.

कुंभ राशीच्या लोकांनी वर म्हटल्याप्रमाणे सर्वच बाबतीत सावध पवित्रा घ्यावा. आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही, कोणाची फसवणूक होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही, याची दक्षता कुंभ राशीच्या लोकांनी घेणे त्यांच्यासाठी इष्ट ठरेल. तसे न केल्यास त्यांना शनी आणि मंगळ यांच्या युतीमुळे होणार त्रास सहन करावा लागेल हे नक्की!