पाकिस्तानने घोडचूक केली, कठोर शिक्षा भोगावी लागेल; नरेंद्र मोदींनी खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 11:13 AM2019-02-15T11:13:49+5:302019-02-15T13:00:34+5:30

Pulawama Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना मोठी किमत चुकवावी लागेल,असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. 

A strong reply will be given to Pulawama Terror Attack, PM Narendra Modi warns to Pakistan | पाकिस्तानने घोडचूक केली, कठोर शिक्षा भोगावी लागेल; नरेंद्र मोदींनी खडसावले

पाकिस्तानने घोडचूक केली, कठोर शिक्षा भोगावी लागेल; नरेंद्र मोदींनी खडसावले

Next
ठळक मुद्देशेजारील देशानं मोठी चूक केली, याची किंमत चुकवावी लागणार - पंतप्रधान मोदीकटकारस्थान रचून आमच्या देशात अस्थिरता निर्माण करणं अशक्य - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - पुलवामादहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. ''पुलवामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. यासाठी भारतीय सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानला खडसावले आहे. 

पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, ''दहशतवादाविरोधातील कारवाई आणखी वेगवान करणार असून दहशतवादी संघटना आणि त्यांना पोसणाऱ्यांना या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. शेजारील देशांचे कुटील मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. भ्याड हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देईल''. 

''जागतिक स्तरावर एकट्या पडलेल्या शेजारील देशाला वाटत असेल की, अशा प्रकारच्या षड़यंत्रांमुळे भारतात अस्थिरता निर्माण होईल, तर तसे कदापि शक्य होणार नाही. 130 कोटी देशवासीय अशा प्रकारच्या कटकारस्थानांविरोधात आणि भ्याड हल्ल्यांविरोधात सडेतोड प्रत्युत्तर देतील.'', असेही मोदींनी ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, आपला देश एकजूट आहे, फक्त राजकारण करू नका, असं आवाहनही यावेळेस पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले आहे.

देशातील सेमी बुलेट 'वंदे भारत एक्स्प्रेस'च्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळेस त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. देशाची सेवा करताना जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. जवानांच्या कुटुंबीयांसहीत माझ्या संवेदना कायम आहेत, अशा भावना यावेळी मोदींनी व्यक्त केल्या. 




दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेऊन पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं घेतली आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. पुलवामा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा निर्धारच या बैठकीत करण्यात आला.


भ्याड हल्ल्यात 44 जवान शहीद

पुलवामा येथे (Pulwama Terror Attack) झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

तालिबानी स्टाईलचा हल्ला
वाहनांमध्ये स्फोटके भरून ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी घुसवायची आणि आत्मघाती हल्ला घडवून आणायचा ही तालिबानी अतिरेक्यांची स्टाइल आहे. असा हल्ला आतापर्यंत भारतात, काश्मीरमध्ये कधीही झाला नव्हता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो तालिबानी संघटनेत कार्यरत होता. त्यानेच हा हल्ला तालिबानी स्टाइलने घडविल्याचे म्हणणे आहे. तालिबानी संघटना पाकमध्ये सैनिकांवर अशाच प्रकारे हल्ला करतात. तीच पद्धत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गुरुवारच्या हल्ल्यात वापरली. 192 काश्मिरी तरूण गेल्या वर्षभरात दहशतवादी संघटनांमध्ये गेले आहेत.
स्थानिक तरूणांनी दहशतवादाकडे वळणे ही लष्कराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. चकमकीत स्थानिक दहशतवाद्यांना मारल्याची काश्मीर खोऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

काय होता गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट?
या हल्ल्याच्या पूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले होते की, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी (९ फेब्रुवारी) अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले त्याच दिवशी हल्ला करायचा कट, अतिरेक्यांनी रचला आहे. हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात. सर्व सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट राहावे.



 



 






 

Web Title: A strong reply will be given to Pulawama Terror Attack, PM Narendra Modi warns to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.