world tourism day special : कुंभनगरीचे पर्यटन ‘रामभरोसे’

By अझहर शेख | Published: September 26, 2018 02:46 PM2018-09-26T14:46:29+5:302018-09-26T15:18:36+5:30

कुंभनगरीचे पर्यटन प्रशासकीय अनास्थेमुळे ‘रामभरोसे’ असल्याचे विदारक चित्र आहे. शेकडो मैलाचा प्रवास करून आलेले पर्यटक शहराच्या इतिहासाची अर्धवट आणि काहीशी चुकीची माहिती घेत संभ्रमाचे पर्यटन करुन परतत आहे. विशेष म्हणजे या शहराचा केंद्र सरकारच्या ‘रामायण सर्किट’ योजनेत समावेश करण्यात आला आहे.

world tourism day special: Kumbhnagiri Tourism 'Ram Bharose' | world tourism day special : कुंभनगरीचे पर्यटन ‘रामभरोसे’

world tourism day special : कुंभनगरीचे पर्यटन ‘रामभरोसे’

Next
ठळक मुद्देशहराचा केंद्र सरकारच्या ‘रामायण सर्किट’ योजनेत समावेश गोदा आरतीचा प्रस्ताव लालफितीतमहापालिकेच्या 'रामसृष्टी'च्या​​​​​​​ वैभवावर फिरले पाणीनाशिकच्या पर्यटनाला ‘अच्छे दिन’ कधी येणार?

अझहर शेख, नाशिक : भारत देशामध्ये सर्वाधिक पर्यटन हे धार्मिक स्वरुपात होते. धार्मिक पौराणिक शहरे देशात बहुसंख्य असून त्यापैकी एक म्हणजे एकेकाळी गुलशनाबाद अशी ओळख मिरविणारी कुंभनगरी नाशिक. धार्मिक पर्यटनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आजही नाशिकमध्ये श्रध्देने येतात; मात्र या कुंभनगरीचे पर्यटन प्रशासकीय अनास्थेमुळे ‘रामभरोसे’ असल्याचे विदारक चित्र आहे. शेकडो मैलाचा प्रवास करून आलेले पर्यटक शहराच्या इतिहासाची अर्धवट आणि काहीशी चुकीची माहिती घेत संभ्रमाचे पर्यटन करुन परतत आहे. विशेष म्हणजे या शहराचा केंद्र सरकारच्या ‘रामायण सर्किट’ योजनेत समावेश करण्यात आला आहे.


शहरातील रामकुंडापासून तर तपोवनापर्यंत सर्वच पर्यटनस्थळे वा-यावर असल्याचे दिसून येत आहे. या पर्यटनस्थळांना भेटी देऊन पाहणी केली असता शहरातील यंत्रणांना पर्यटनस्थळे, पर्यटकांचे समाधान, प्राचीन मंदिरे त्यांचा इतिहास, सोयीसुविधा अशा कु ठल्याही बाबींचे सोयरसूतक नसल्याचे दिसते. नाशिक शहर हे देशभरात नव्हे तर जगभरात धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. गोदावरीच्या काठावरील एकापेक्षा एक लहान-मोठे मंदिरे व त्यांचे महात्त्म्य हे भाविकांसाठी श्रध्दास्थान आहे. प्रभू रामचंद्रांचे वनवासकाळात वास्तव्य, रावणाने सीतेचे केलेले हरण आणि लक्ष्मणाने शृपनखेची कापलेली नासिका, कपिला ऋषी, दंडकू ऋषी यांची तपश्चर्या आदि पौराणिक घटनांचा साक्षीदार असलेला तपोवन-पंचवटी परिसर हे शहराचे मुख्य धार्मिक पर्यटनाचे केंद्र आहे. या केंद्राकडेच महापालिका,  राज्य पर्यटन विकास महामंडळ या संस्थांच्या प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना जी काही माहिती मिळते ती केवळ ‘तपोवन-पंचवटी दर्शन’ घडविणा-या रिक्षाचालकांकडूनच. रिक्षाचालक गाईडच्या भूमिका बजावताना दिसून येतात. शहरात येणारा पर्यटक वर्ग हा दक्षिण भारतीय राज्यांमधील अधिक आहे. याबरोबरच गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांमधूनही पर्यटक मोठ्या संख्येने धार्मिक पर्यटनासाठी येतात.

पंचवटी भागातील गोदाकाठावरील रामकुंडापासून अन्य प्राचीन १७ कुंडांची माहिती, गंगा-गोदावरी प्राचीन मंदीर व त्यांची महती, इतिहास, गोदावरीला लाभलेला पौराणिक वारसा अशी कुठलीही माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, मल्याळम, तमीळ आदि भाषांमध्ये दर्शनी भागात उपलब्ध करुन देणे अपेक्षित असताना याकडे महापालिका व जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. यामुळे पर्यटकांच्या डोळ्यांना केवळ मंदिरे, नदी हेच दिसते, आपण नेमके काय बघतो आणि कशासाठी? त्याचे महत्त्व व वैशिष्टये काय ? या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने प्रभू रामचंद्र यांच्याशी संबंधित शहरांचा विकास तीर्थक्षेत्र म्हणून करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ‘रामायण सर्किट’ योजना मंजूर केली आहे. या योजनेतदेखील नाशिक पुण्यनगरीचा समावेश आहे.

‘तपोवन’ शोधावे कुठे?
तपोवन या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तप करण्यासाठी निवडलेले दंडकारण्य. हे तपोवन पंचवटीच्या पुर्वेला असून गोदावरी-कपिला नद्यांच्या संगमावर वसलेलं हे तीर्थक्षेत्र आहे. तपोवनात असलेल्या धार्मिक आठ ठिकाणे अष्टतीर्थ म्हणून ओळखली जातात. याची कुठलीही माहिती या भागात दुर्देवाने वाचण्यासाठी कुठल्याही भाषेत पर्यटकांना अद्याप उपलब्ध झालेली नाही. ऋषी-मुनींनी अनुष्ठान, जप, ध्यानधारणा, यज्ञ यांसारखी तपश्चर्या केल्याची अख्यायिका सांगितली जाते. काळानुरूप दंडाकारण्य नाहीसे झाले असले तरी त्याची महती कायम आहे; मात्र ही महतीची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून होत नाही, यामुळे धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा येते. भारतामधील एकमेव पुरातन लक्ष्मण मंदिर तपोवनात आहे. या ठिकाणी रावणाची बहीण शुर्पनखेचे नाक लक्ष्मणाने कापले व ते गोदावरीत फेकल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. म्हणून या जागेला तपोवन असे नाव पडले; मात्र हे ‘तपोवन’ शोधावे कुठे अन् जाणावे कसे ? हाच प्रश्न सध्या येथे येणा-या पर्यटकांना पडत आहे.


नाशिक आणि प्रभू रामचंद्र
वनवासकाळात प्रभू रामचंद्र नाशिकमधील पंचवटी, तपोभूमुी-दंडकारण्यात वास्तव्यास होते. येथेच रामचंद्रांनी मारीच नावाच्या राक्षसाचा वध गोदाकिनारी केला. तसेच खर, दुषण, त्रिफिरा या तीन राक्षसांच्या सेनेसोबत प्रभू रामचंद्र व वानरसेनेचे युध्द झाले. यावेळी जुने नाशिक गावठाण भागातील गोदाकाठावर या तीनही राक्षसांचा रामचंद्रांनी वध केला. ती जागा ‘त्रिवध’ नावाने ओळखली जाऊ लागली; मात्र पुढे त्रिवधचा अपभ्रंश होऊन तीवंधा लेन म्हणून हा परिसर आज ओळखला जातो. तसेच गोदावरीच्या रामकुंडात प्रभू रामचंद्र स्नानासाठी येत असे. या कुंडापासून पुढे काही मीटर अंतरावर असलेल्या ‘रामगया’ नावाच्या कुंडात त्यांनी आपले वडील दशरथ यांचे श्राध्द केल्याची अख्यायिका आहे. पंचवटीतील पाच वडांच्या छायेत असलेल्या एका गुहेत सीतादेवी माता वास्तव्यास होत्या, म्हणून ही गुहा सीता गुहा म्हणून आज ओळखली जाते. पंचवटीतील रामकुंडावरुन थेट ६ मैलावरील भुयारी मार्गातून प्रभू रामचंद्र एका किल्ल्यावर विश्रांती साठी जात असे, तो किल्ला इतिहासातील महत्त्वाचा किल्ला मानला जातो व रामशेज नावाने ओळखला जातो. या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आशावाडी आहे. तसेच तपोवनात प्रभू रामचंद्र यांचे बंधू लक्ष्मण यांनी सीताहरणाचा बदला घेण्यासाठी रावणाची बहीण शृपनखेचे नाक तपोवनात कापल्याची पुराणकथा आहे. नाक हा मराठी शब्द असून संस्कृत मध्ये नासिका असा शब्द आहे. या घटनेवरुन नाशिक असे नाव पडल्याचे बोलले जाते, अशी माहिती इतिहासप्रेमी देवांग जानी यांनी दिली.

महापालिकेच्या 'रामसृष्टी'च्या वैभवावर फिरले पाणी
तपोवनामध्ये प्रवेश करणा-या पर्यटकांच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहुर उठत असावे. कारण तपोवनात येताना त्यांना कुठेही असे जाणवत नाही की आपण प्रभू रामचंद्र यांच्या वनवासकाळातील तपोभूमीत आलो आहे किंबहुना त्याची जाणीव करुन देणारे तपोवनात असे काही प्रकल्प महापालिका व पर्यटन विभागाला राबविता आलेले नाही. रामसृष्टी उद्यान वगळले तर दुसरे येथे कोणताही नवनिर्माण प्रशासनाला करता आला नाही आणि ते करुन घेण्याची इच्छाशक्तीही लोकप्रतिनिधींनी दाखविली नाही. ‘रामसृष्टी’ हा सुंदर शब्द उद्यानाला देऊन प्रशासन मोकळे झाले; मात्र या उद्यानाची सुंदरता आणि वैभव जोपासण्यामध्ये ते सपेशल अपयशी ठरले ही वस्तुस्थिती. तपोवनामध्ये आलेल्या भाविक पर्यटकांना तपोवनाची पौराणिक माहिती व इतिहास कुठून आणि कसा मिळेल? हा मोठा प्रश्न असतो.

गोदा आरतीचा प्रस्ताव लालफितीत
राज्य पर्यटन महामंडळाने नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने दहा लाख रुपयांचा गंगा-गोदा आरतीचा प्रस्ताव हरिद्वारच्या धर्तीवर मंजूरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठविला. मात्र या गोदावरी आरतीचा प्रस्तावाला मंजुरी मिळून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. यामुळे धार्मिक पर्यटनवृध्दीसाठी मैलाचा दगड ठरणारा हा उपक्रम सुरू होण्याअगोदरच लालफितीत अडकला. गोदावरी आरतीचा उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून काळ उलटला आहे. एकूणच राज्य पर्यटन मंत्र्यांचे अलिकडे शहरात झालेले दौरे, अन् घोषणा बघता नाशिकच्या पर्यटनाला ‘अच्छे दिन’ कधी येणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

Web Title: world tourism day special: Kumbhnagiri Tourism 'Ram Bharose'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.