केलापाणी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:23 IST2018-04-06T12:23:30+5:302018-04-06T12:23:30+5:30

Water wandering water | केलापाणी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

केलापाणी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क
मोदलपाडा : तळोदा तालुक्यातील  सातपुडा पर्वतरांगेत 500 लोकसंख्या असलेल्या  केलापाणी येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे केलापाणी गाव तळोदापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथील ग्रामस्थांना  दरवर्षी  उन्हाळ्यात   पाणीटंचाईला सामना करावा          लागत असून डोंगरद:या ओलांडून   नदी, नाले व  डबक्यातील पाणी आणावे लागते.
नदीच्या पात्रात असलेल्या डबक्याकडून केलापाणी ग्रामस्थ पाणी आणतात. या डबक्यातच जनावरेही पाणी पितात. तेथून आणलेल्या पाण्यावर ग्रामस्थ आपली तहान भागवतात. त्यामुळे विविध आजारांनाही तोंड द्यावे लागते. या डबक्यातील पाणी ग्रामस्थ वापरण्यासाठी आणत असल्याने जनावरांसाठी पाणी उपलब्ध राहत नसल्याने पशुपालकांसमोर समस्या निर्माण होते. उन्हाळ्याला दोन महिने शिल्लक असताना जलस्त्रोत आटत असल्याने चिंता व्यक्त केली जात    आहे. यंदा मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा वाढल्यामुळे           येथील पाणीटंचाई तीव्र झाली           आहे.
जिल्ह्यातील सातपुडय़ात दुर्गम भागात आजही भौतिक सुविधा, पाणीटंचाई, रस्ते, दवाखाना, वीज आदी   सुविधा वेळेवर मिळत नाहीत. पूर्वी नदी-नाल्यांना बारामही पाणी वाहत असे. परंतु आठ-दहा  वषार्पासून पाऊस कमी कमी होत गेल्याने पाणीटंचाईचे प्रमाण वाढत आहे. नदी-नाले ओस पडत असून सातपुडय़ातील वनगावे, गावे, पाडय़ांवर पाणीटंचाईची तीव्रता जाणवत आहे.  तसेच भूगार्भातील पाणी पातळीसुध्दा खूप खोलवर गेल्याने हातपंप, विहीर, बोरवेल ओस पडत आहे. काही गावात नदी-नाल्यातील डबक्यातील पाणी प्यावे लागत आहे. केलापाणी गावात शासनाकडून पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली नाही. केलापाणी ग्रामस्थांना वर्षानुवर्षापासून उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने याठिकाणी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.                                              

Web Title: Water wandering water