परिवहन खाते शिवसेनेकडे असल्यामुळे एस टी संपाबाबत भाजपा उदासिन : विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 18:20 IST2017-10-17T18:10:19+5:302017-10-17T18:20:52+5:30
सरकार म्हणून जबाबदारी निभावणे किती कठिण असते, याची प्रचिती आता शिवसेनेला येत असेल. हे खाते शिवसेनेकडे असल्याने भाजपने जाणीवपूर्वक या आंदोलनाबाबत उदासीन भूमिका तर घेतली नाही ना, असा प्रश्न विखे यांनी उपस्थित केला आहे.

परिवहन खाते शिवसेनेकडे असल्यामुळे एस टी संपाबाबत भाजपा उदासिन : विखे
शिर्डी : एस. टी. कर्मचा-यांच्या संपामुळे राज्यातील ऐन दिवाळीत वाहतूक कोलमडली असून, सरकारने कामगार संघटनांना विश्वासात घेऊन हा संप मिटवावा आणि प्रवाशांना दिलासा मिळवून द्यावा. हे खाते शिवसेनेकडे असल्याने भाजपने जाणीवपूर्वक या आंदोलनाबाबत उदासीन भूमिका तर घेतली नाही ना, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
एस. टी. कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे राज्यभरातून प्रवाशांना विशेषत: महिलांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सरकारने हा मुद्दा अधिक प्रतिष्ठेचा न करता तातडीने सामोपचाराची भूमिका घ्यावी, असे विखे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. विखे म्हणाले की, परिवहन खात्याचे मंत्री हेच आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. सरकारमध्ये राहून सवंग लोकप्रियतेसाठी विरोध करणे सोपे असते. मात्र सरकार म्हणून जबाबदारी निभावणे किती कठिण असते, याची प्रचिती आता शिवसेनेला येत असेल. हे खाते शिवसेनेकडे असल्याने भाजपने जाणीवपूर्वक या आंदोलनाबाबत उदासीन भूमिका तर घेतली नाही ना, असा प्रश्न विखे यांनी उपस्थित केला आहे.
सरकारमधील दोन प्रमुख पक्षांमध्ये असलेल्या विसंवादातून वेगवेगळ्या स्तरावर सातत्याने शह-काटशहाचे राजकारण खेळले जात असून, त्याचेच पडसाद एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनात उमटले असण्याची शक्यता विखे यांनी वर्तवली. सरकार म्हणून शिवसेना सर्वसामान्य प्रवाशांच्या बाजूने असेल तर तातडीने एसटी कर्मचा-यांचा संप मिटवावा. अन्यथा सरकारमधील जबाबदारी पार पाडता येत नाही म्हणून सत्तेतून बाजूला व्हावे, असेही विखे म्हणाले.