लाँग मार्चचा धसका; सरकारकडून मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 02:48 PM2018-03-11T14:48:15+5:302018-03-11T16:10:20+5:30

165 किमीचे अंतर कापून लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकलेल्या शेतकरी मोर्चाचा फडणवीस सरकारने चांगलाच धसका घेतला आहे.

kisan morcha for complete loan waiver at the gate of mumbai | लाँग मार्चचा धसका; सरकारकडून मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

लाँग मार्चचा धसका; सरकारकडून मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

googlenewsNext

मुंबई : 165 किमीचे अंतर कापून लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकलेल्या शेतकरी मोर्चाचा फडणवीस सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. उद्या सोमवारी विधानभवनावर हा मोर्चा धडकण्याआधीच सरकारने मध्यस्थी करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षानेही पाठींबा दिला आहे. 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या वतीने किसान मोर्चातील शेतकऱ्यांची विक्रोळीत भेट घेत स्वागत केलं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल, असं आश्वासन महाजनांनी मोर्चेकऱ्यांना दिलं. 
लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यावर, लिखित आश्वासनाच्या मागणीवर चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास महाजनांनी यावेळी व्यक्त केला. 

विधान भवनाला घेराव  - 
नाशिकमधून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतक-यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. शनिवारी रात्री ठाण्यात मुक्काम केल्यानंतर 35 हजार शेतक-यांसह किसान मोर्चाने मुंबईत प्रवेश केला आहे. किसान मोर्चा आज मुंबईत मुक्काम ठोकेल तर सोमवारी सकाळी विधान भवनाला घेराव घालणार आहे.

मनसेचा पाठिंबा, राज ठाकरे घेणार भेट -
काल डाव्या पक्षांच्या या मोर्चाला पाठिंबा देण्याचं शिवसेना आणि मनसेने जाहीर केल्यानंतर आज संध्याकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे शेतकरी मोर्चाच्यामध्ये सामील झालेल्या शेतक-यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास सोमैय्या मैदान, चुनाभट्टी-सायन येथे राज ठाकरे त्यांची भेट घेतील. हा महामोर्चा मुंबईत दाखल झाल्यावर मनसेकडून चेंबूर येथे मोर्चाचे स्वागत होणार आहे. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला होता. मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस - 

शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा मनापासून पाठिंबा असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी उभे राहतील. सामूहिक कार्यक्रम ठरल्यावर त्याच्या पाठीशी सातत्याने राहणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं. 

सरकारची भूमिका - 
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असून उद्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करणार आहे. त्यावेळी विविध खात्यांचे पदाधिकारी चर्चेत उपस्थित राहतील असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे. 

वाहतूकीत बदल - 
हा महामोर्चा मुंबईत धडकत असल्यामुळे मुंबई शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत ईस्टर्न एक्स्प्रेस वे मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. या काळात मुंबईहून ठाण्याकडे जाणारी अवजड व माल वाहतूक करणारी वाहने वाशी खाडीपुलावरून ऐरोली, विटावामार्गे ठाण्याकडे वळविण्यात आली आहे. शेतक-यांचा लाँग मार्च ज्या रस्त्यावरून जाणार आहे तेथून कार व लहान वाहनांना केवळ तासी 20 किमी वेगाने जाता येणार आहे. मुलुंड ते सोमय्या मैदान-चुनाभट्टीपर्यंतचा मार्ग वाहनचालकांनी वापर करणे टाळावे त्याऐवजी लालबहादूर शास्त्री मार्ग, सायन-पनवेल मार्ग, ठाणे-बेलापूर या मार्गांचा वापर करावा असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.

राज्यभरातून शेतकऱ्यांची उपस्थिती - 
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होत असून मोर्चेकऱ्यांची संख्या वाढत असून मुंबईमध्ये त्यांची संख्या २५ हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. नाशिकवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या या मोर्चामध्ये नाशिकसह अहमदनगर, परभणी, औरंगाबाद, नंदुरबार, सांगली, पुणे, कोल्हापूर, नांदेड, पालघर आणि ठाण्यातील शेतकऱ्यांचा सहभाग आहे.

....आणि लॉंग मार्चमधील माय मावल्यांच्या हृदयाचा बांध फुटला ! 
दरम्यान ठाण्याआधी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च कसारा घाट उतरून शहापूर तालुक्यात दाखल झाला होता. शेतकरी बापाने आत्महत्या केलेल्या 25 मुलींनी या लॉंग मार्चचे अत्यंत हृदयद्रावक शब्दात स्वागत केले. शेतकरी बापाच्या आत्महत्येचे दुःख लॉंग मार्च समोर मांडताना शेतकऱ्यांच्या या लेकी अत्यंत भावना  विवश झाल्या होत्या. शेती परवडली नाही म्हणून हतबल होत बापानं आत्महत्या केली. तुम्ही उरलेल्या बापांना घामाचे दाम मिळावे म्हणून लढत आहात  म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा शब्दात शेतकऱ्यांच्या या लेकींनी लॉंग मार्चला आपला पाठिंबा व्यक्त केला. बापाच्या व्यथा मांडताना त्यांचा कंठ दाटून येत होता. लॉंग मार्च मध्ये सामील शेतकऱ्यांच्या पोरांच्याही काळजाला पीळ पडत होता. माय मावल्यांनी तर अश्रूंना वाट मोकळी एकूण देत आपल्या भावना व्यक्त केल्या. आत्महत्या पर्याय नाही संघर्ष पर्याय असल्याचे या मुली काकुळतीला येऊन सांगत होत्या. शेतकऱ्यांच्या या लेकींना वडील गेल्या नंतर आधार तीर्थ आधार आश्रम नाशिक या संस्थेने आधार दिला. संस्थेचे त्रिंबक गायकवाड हे ही यावेळी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांचे स्वागत

घाटन देवी येथील मुक्काम संपवून लॉंग मार्चची अत्यंत उत्सहात  सकाळी 7 वाजता पुन्हा मुंबईकडे कूच केले. रस्त्यात गावोगावचे शेतकरी लॉंगमार्च मध्ये सामील होत असल्याने लॉंग मार्च मध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांचा उत्साह वाढत आहे. पिण्याचे पाणी व फुले देऊन गावोवागचे शेतकरी लॉंगमार्चचे स्वागत करत आहेत. मोरखाने येथील माजी सरपंच वेखंडे यांनी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देत शेतकऱ्यांचे स्वागत केले. कसारा घाट उतरल्या नंतर शहापूर तालुक्यातील शेतकरी लॉंग मार्च मध्ये सामील झाले. वाडा, तलासरी व परिसरातील शेतकरी उद्या लॉंगमार्चमध्ये सामील होतील. 

शेतकऱ्यांच्या पायांना जखमा

प्रखर उन्हात लॉंग मार्च सुरु असल्याने लॉंग मार्च मध्ये सामील असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या पायांना जखमा झाल्या आहेत. उन्हाचा असह्य चटका बसत असल्याने अनेक शेतकरी त्यामुळे आजारी पडत आहेत. नाशिक येथील एम.एस.एम.आर.ए. संघटनेने या शेतकऱ्यांसाठी आज उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. डॉ. समीर आहिरे, विशाखा बावा, युवराज बावा, मंगलाताई गोसावी, डॉ. मंगेश मांडावे यांनी यावेळी आजारी शेतकऱ्यांवर उपचार केले.   

Web Title: kisan morcha for complete loan waiver at the gate of mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.