गांधी जयंतीला वीस कैद्यांची सुटका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:53 IST2018-09-27T00:53:27+5:302018-09-27T00:53:31+5:30

Gandhi Jayanti will get rid of twenty prisoners | गांधी जयंतीला वीस कैद्यांची सुटका होणार

गांधी जयंतीला वीस कैद्यांची सुटका होणार

एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कारागृहात आल्यापासून चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, निटनेटकेपणा, कष्ट करण्याची तयारी, इतरांशी आपुलकीने बोलणे अशा सर्वसंपन्न गुण प्राप्त केलेल्या कैद्यांना दोन ते अडीच वर्षांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. त्यापैकी वीस कैद्यांना २ आॅक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त कारागृहातून घरी सोडले जाणार आहे. कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा आगळा-वेगळा निरोपाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. यंदाची दिवाळी या कैद्यांना कुटुंबासोबत साजरी करण्याचे भाग्य मिळाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीयांचा आनंदही ओसंडून वाहत आहे. गेल्या दोन वर्षांत शिक्षा माफ झालेल्या सुमारे ४५० कैद्यांना कारागृहातून घरी सोडले आहे.
२ आॅक्टोबर या गांधी जयंतीला यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने गांधी वर्ष साजरे करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार नियमात बसलेल्या ६० वर्षांवरील पुरुष व ५५ वर्षांच्या पुढील महिला कैद्यांची शिक्षा माफ करून त्यांना घरी सोडण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम एकाचवेळी देशातील तीन हजार कारागृहांत आयोजित केला आहे. महाराष्टÑात ५२ कारागृह आहेत. समाजातील काही व्यक्तींकडून कळत-नकळतपणे, अनवधानाने किंवा रागाच्या भरात घडलेल्या एका चुकीमुळे अनेक तरुण विविध बंदी कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत आहेत. जीवनातील उमेदीचा काळ कारागृहातच जातो.
सात ते चौदा वर्षे आणि आजन्म कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. कारागृहात पडेल ते काम करण्याची तयारी, चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, आपुलकीने बोलणे, आदी कैद्यांच्या रोजच्या दिनमानाची नोंद कारागृहात ठेवली जाते. चार वर्षे शिक्षा चांगल्या प्रकारे भोगली आहे व कैद्यांच्या मानसिकतेत चांगला बदल झाला आहे, याची खात्री कारागृह अधीक्षकांना झाल्यानंतर ते शासनाच्या कक्षेत राहून कैद्यांना शिक्षेत सूट देतात.
१९८५ कैद्यांचा
मुक्काम कारागृहात
कळंबा कारागृहात मुंबई, ठाणे, कल्याण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणांचे १९१४ पुरुष व ७१ महिला असे १९८५ कैदी या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत. कैद्यांना ठेवण्यासाठी सर्वसोयींनी-युक्त११ बरॅक्स या ठिकाणी आहेत.
कमिटीच्या निर्णयानंतर सुटका
खुनाच्या गुन्ह्यांत आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या कारागृहातील दोन महिलांसह पंधरा कैद्यांना आतापर्यंत चौदा वर्षांच्या शिक्षेनंतर घरी सोडून दिले आहे. या शिक्षेत कैद्याला शेवटच्या श्वासापर्यंत कारागृहात राहावे लागते; परंतु त्याची वर्तणूक चांगली असेल, त्याचे वय ६५ च्या पुढे असेल तर शासनाने नियुक्तकेलेले कारागृह अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांची कमिटी या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेते.

Web Title: Gandhi Jayanti will get rid of twenty prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.