तटरक्षक दल सदैव जागरूक असणे महत्त्वाचे
By Admin | Updated: February 22, 2017 04:36 IST2017-02-22T04:36:41+5:302017-02-22T04:36:41+5:30
देशातील बंदरे विकसित आणि सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तटरक्षक दल नेहमी सदैव

तटरक्षक दल सदैव जागरूक असणे महत्त्वाचे
वास्को (गोवा) : देशाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या आयात-निर्यातीसाठी बहुतांशी जलमार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे देशातील बंदरे विकसित आणि सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तटरक्षक दल नेहमी सदैव जागरूक असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी येथे केले़
वास्को येथील गोवा शिपयार्ड कंपनीने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘आयसीजीएस शौनक’ या गस्ती नौकेच्या हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंह, नौदलाचे गोवा विभागीय ध्वजाधिकारी रिअर अॅडमिरल पुनितकुमार बहल, तटरक्षक दलाचे संयुक्त महासंचालक के . नटराजन, गोवा शिपयार्डचे कार्यकारी संचालक निवृत्त रिअर अॅडमिरल शेखर मित्तल व शौनक जहाजाचे नेतृत्व करणारे कमांडिंग आॅफि सर उपमहासंचालक टेकुर शशीकुमार आदी उपस्थित होते़
संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी ६ अत्याधुनिक गस्ती नौका बांधण्याचे काम गोवा शिपयार्ड कंपनीकडे दिले असून या मालिकेतील ‘आयसीजीएस शौनक’ ही चौथी नौका आहे़ ही नौका मुदतीपूर्वी ६२ दिवस आधीच
बांधून पूर्ण करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
‘आयसीजीएस शौनक’ची वैशिष्ट्ये
१०५ मीटर लांबीची ही नौका पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे़ त्यावर अत्याधुनिक जलवाहतुकीची व दळणवळणाची यंत्रणा, सेन्सर आणि अन्य यंत्रसामग्री आहे़ या नौकेवर ३० मिमी क्षमतेची नौदल तोफ, इंटिग्रेटेड ब्रीज सिस्टम, इंटिग्रेटेड मशिनरी कंट्रोल सिस्टम, पॉवर मॅनेजमेंट सिस्टम आणि हाय पावर एक्सटर्नल फ ायर फ ायटिंग पद्धतीची यंत्रणाही आहे़ तसेच दोन इंजिनाचे हेलिकॉप्टर आणि पाच वेगवान बोटी वाहून नेण्याची सुविधाही नौकेवर आहे़ या नौकेची कमाल वेग २६ सागरी मैल आहे. नौकेवर १४ अधिकारी आणि ९८ जवान तैनात असतील.