'लोकमत' लेखमालाः शिशीर सरला, वसंत आला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 11:35 AM2018-03-02T11:35:09+5:302018-03-02T13:32:31+5:30

समाजातले भेदभाव विसरून एकात्मता दाखवणारे हे सण नववर्षाच्या सुरुवातीपासून सुरू होऊन, शेवटी होळीला संपतात. हे आपल्याला हिंदू धर्माचे मोठेच वरदान आहे.

lokmat special feature on vasant rutu | 'लोकमत' लेखमालाः शिशीर सरला, वसंत आला!

'लोकमत' लेखमालाः शिशीर सरला, वसंत आला!

Next

- रवींद्र वासुदेव गाडगीळ

वसंत ऋतू येतो, तोच मुळी झाडांच्या शेंड्यावर नाचत, नाचत! आकाश स्वच्छ, नीरभ्र, नीतळ दिसू लागते. मेघांचे लहानमोठे तुकडे क्षितीजांच्या कडांशी दडी मारून बसतात. भगवान कामदेवांच्या क्रीडेला सुरुवात होते. कामदेव आपले पुष्पमय धनुष्य सज्ज करतात. त्याबरोबर भ्रमरांची रुणझुण, कोकीळकणातला मधुर स्वर आणि मृदू पर्णांची सळसळ सारे एकवटल्याचा भास होतो. अशोकाची पाने लवलवतात, आम्रवृक्षाचा मोहर विकसतो. नवममल्लिकेची  शुभ्र फुले हसू लागतात आणि नीळकमळे पाण्यातल्या पाण्यात नाचू लागतात. बगळ्यांचे शुभ्र थवे इकडून तिकडे उडत असतात. क्षितीजांच्या कडाशी दडलेली  सायंकालीन मेघ सुवर्णपुष्पे उधळू लागतात, जणू त्या सुवर्णपुष्पांना लालचावलेल्या पाण्यातल्या जलदेवता भूपृष्ठावर येतात. त्यावेळी त्यांच्या वस्त्रांची फडफड होते आणि त्या वस्त्रांना बिलगून वर आलेला सुगंधी व सुखद असा वारा साऱ्या आसमंतात दशदिशांत पसरतो. याच क्षणाला आपल्या प्रिय सख्यांचे स्वागत करण्यासाठी की काय, भगवान चंद्रमा घाईघाईने पूर्वदिशेला डोकावतो. कामदेव आपल्या दिग्विजयाला निघतात. सारी सृष्टी चांदण्यात न्हाऊन निघाल्याने प्रसन्न आणि मनोरम दिसते. अशा वेळेस तारुण्याचा फुलोरा फुलत नाही, असा सृष्टीत एक क्षणही जात नाही. खरे तर, वसंत ऋतू नाही, असा एकही दिवस नाही, कारण वसंत ऋतू कधीच सरत नाही. 

आंब्याची पानं सळसळत असतात आणि नाजूकसाजूक पालवी अंजिरी रंगाने न्हाऊन निघते. वसंत ऋतूत जुनी पालवी गळते आणि नवा मोहोर येऊन त्याने दशदिशा सुवासिक होतात. तरुणांना नेहमीच हर्षदायक व सुखकर वाटतो, हा ऋतू! वसंत ऋतू आल्यावर शिशीर ऋतूने फार रेंगाळू नये. सद्यस्थितीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काठी टेकणारे आजोबा नातवांना खेळवायचे सोडून, राजकारणात नित्यनूतन खेळी करायला निघाले आहेत. 'आता जा' असे कुणी सांगण्याच्या आत त्यांनी नव-तरुणांना वाव देऊन पायउतार व्हावे, हेच उत्तम! हाच ह्या वसंताचा संदेश! स्वत:ला कोणाचातरी नातू म्हणून मिरवून घेणारा आताशी आजोबा झाला, तरी नातूस खेळवण्यास तयारी नाही, ही आहे, आजच्या राजकारणाची शोकांतिका! असो...

अशावेळेस चैत्रगौरीची आठवण येते. लहानपणी आपल्या घराघरातून (आजही गावांकडे बहुदा होत असेल) वसंत ऋतूच्या आगमनाप्रित्यर्थ नवीन वर्षाच्या प्रथम दिनी चैत्र नवरात्राच्या निमित्ताने चैत्र गौरीचे दरवर्षी आगमन होत असे, मांडणी होत असे, पूजन होत असे. पेट्यांवर पेट्या ठेवून आकर्षक आरास केली जात असे.  स्वच्छ चादर, त्यावर शिकारखाना, खेळणी, इ. मांडली जात असे. पाळण्यात गौर बसे. तिला प्यायला छोट्या तांब्या-भांड्यात पाणी ठेवले जाई. तिला गोड-गोड जेवणाचा नैवेद्य दाखवला जाई. प्रत्येकीच्या घरी एक दिवस अशा रितीने अक्षयतृतीयेपर्यंत हळदी-कुंकू समारंभ किंवा वासंतिक संमेलन सुरू असे. ते एक प्रकारचे, स्व-कला, हस्तकलेचे छोटे प्रदर्शन असे. ज्यात विणलेले रूमाल, तोरणे असत. तसेच, अनेक पदार्थही असत. थंडगार पन्हे, कच्च्या कैरीचे किंवा उकडलेल्या पक्क्याकैरीचे पन्हे, कोशिंबीरी, खिरापती, करंज्या, लाडू, चकल्यांची भरलेली ताटे, उसाचा ताजा रस, टरबुजाच्या, खरबुजाच्या, साखरपेठीच्या फोडी, हरभऱ्याची उसळ,  विविध फुलांच्या कुंड्या , रंगीबेरंगी चित्रे, एक मोठ्ठा आरसा,  इ. अनेक प्रकार आबालवृद्धांना आनंद देत असत. सर्व स्त्रिया नवीन लुगडे/साड्या/नऊवारी नेसून, हाता-गळ्यात सुवर्णालंकार, आंबाड्यावर मोगऱ्याचे सुरेख गजरे घालून आनंदाने एकमेकींच्या घरी जात असत. अत्तरदाणी, गुलाबदाणी, सुगंधी उदबत्त्यांचा सुवास दरवळत असे. ओल्या-भिजवलेल्या चण्यांनी ओटी भरून हळद-कुंकवाचा कार्यक्रम पार पडत असे. मग फुगड्या, झिम्मा, उखाणे, गाण्याच्या भेंड्या, पाळणे, झोके हे खेळ होत असत. उत्साह नुसता दुथडी भरून वाहत असे. नृत्यगायनाचा, व्याख्यानाचा, प्रवचन-कीर्तन-भजनाचा आध्यात्मिक कार्यक्रमही होत असे.

रांधा-वाढा-उष्टी काढा आणि सदानकदा `चूल आणि मूल' ह्यात रमणारी व राबणारी स्त्री जरा कुठे मोकळा श्वास घेऊ शकेल, स्वत:ची सुख-दु:खे एकमेकींशी, समवयस्क मैत्रीणींशी, सखी-शेजारणींशी, नातलगांशी देवाण-घेवाण करू शकेल, यासाठी हे धर्म संबंधित सण समाजाने स्वत:वर लादून घेतले. ह्यात कुठलीही, कोणाचीही तक्रार नसे. उलट एकमेकींच्या मदतीला धावून जाणे, हे परमकर्तव्य मानत. ज्येष्ठ व श्रेष्ठ स्त्रियांकडून पडणाऱ्या दैनंदिन प्रश्नांची उकल, गूढ गोष्टी, सल्ले, उपदेश, डोस, कागाळी, न्याय, तक्रारी, समस्या इ. सोडवल्या जात.

समाजातले भेदभाव विसरून एकात्मता दाखवणारे हे सण नववर्षाच्या सुरुवातीपासून सुरू होऊन, शेवटी होळीला संपतात. हे आपल्याला हिंदू धर्माचे मोठेच वरदान आहे. गलिच्छता, अशिक्षितपणा, अज्ञानता, अंधश्रद्धा, इ. टाकून देऊन अमंगळ, अशुभ, खोटेपणा, दांभिकपणा, अहंकार, असत्य, असामाजिक, अनैतिकत ह्यांच्या विटाळ मानून, त्याग करून नवे वर्ष नवे संकल्प घेऊन राष्ट्र, राज्य, गाव, खेडी, गल्ली, मानव ह्यांच्या विकासासाठी शांती, संरक्षण, परस्परसहकार्य ह्यासाठी पुनश्च जोमाने उभे राहावयाचा हा वसंत ऋतु!

'वसंत' ऋतूत सृष्टीचा कायापालट करण्याचे, चैतन्य निर्माण करण्याचे, जगण्याला नवी उमेद देण्याचे जेवढे सामर्थ्य आहे, तेवढे सामर्थ्य 'वसंत' नावाच्या बहुसंख्य मंडळींमध्येही आढळून आले. म्हणून अशा 'वसंतां'ची लेखमालाच का करू नये, असा विचार डोकावला आणि कामाला लागलो. त्यातून जे नवनीत आले, ते ह्या लेखमालेच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. त्याचा आस्वाद घ्या आणि आपल्या सूचना, अभिप्राय तसेच आपल्या परिचयातील वसंताची माहिती देण्यास विसरू नका. 

उद्यापासून आपण 'वसंत' नावाच्या अनेक व्यक्तींचे इथे स्वागत करणार आहोत. निदान दोन महिने, म्हणजे ६० वसंत इथे फुलतील. त्यांनी लिहिलेल्या किंवा त्यांच्यावर कोणीतरी लिहिलेल्या वैचारिक, सुगंधी व नेहमी ताज्या हिरव्यागार मोहोराखाली आपण मनसोक्त धुंद होऊया. तसेच, स्मृतीरूपी कोकीळेच्या गोड आठवणींच्या कुंजनात आपण सारे बहरूया. ह्याला कोणतीही सीमा नाही. छोटा-मोठा भेद नाही. फक्त अट एकत्र, अशा 'वसंतांनी' स्वकर्तृत्वाने आपल्या जीवनात `वसंत' फुलवलेला असावा. कळत-नकळत राष्ट्राची, राज्याची, समाजाची कशाही प्रकारे सेवा, जी अनमोल आहे, ती केलेली हवी. जेणेकरून येणाऱ्या नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळून नवचैतन्य व स्फूर्ती लाभो, ही सदिच्छा! 

ravigadgil12@gmail.com

Web Title: lokmat special feature on vasant rutu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.