अखेर जवाहरनगर उड्डाण पुलाखालील दुर्गंधी हटविली
By Admin | Updated: August 2, 2015 00:53 IST2015-08-02T00:53:57+5:302015-08-02T00:53:57+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाखाली नागरिकांकडून दोन्ही बाजुला घाण केली जाते.

अखेर जवाहरनगर उड्डाण पुलाखालील दुर्गंधी हटविली
दणका लोकमतचा
जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाखाली नागरिकांकडून दोन्ही बाजुला घाण केली जाते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच शनिवारी पुलाखालील दुर्गंधी हटविण्यात आली.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. जिल्ह्यात रोगराईचे दिवस आहे. ठाणा पेट्रोलपंप टी पार्इंट उड्डाण पुलाखाली घाण कचरा व सडका पालेभाज्यांसह अन्य दुर्गंधीयुक्त पदार्थ येथे टाकण्यात येते. यासोबतच बसच्या प्रतिक्षेत असलेले प्रवासी व पुलाखालून जाणारे नागरिक वेळप्रसंगी कोपऱ्यात लघुशंका करीत असल्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्याता वाढली होती. शाळकरी मुलांना व प्रवाशांना पुलाखाली बसची प्रतिक्षाकरिता उभे राहणे त्रासदायक झाले होते. याची मागणी भंडारा जिल्हा मानवाधीकार संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र लेंडे यांनी जे. एम. सी. मुख्य कंत्राटदाराला दिली.
या आशयाची माहिती लोकमतने शनिवारला 'उड्डाण पुलाखालील दुर्गंधी हटविण्याची मागणी' या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले. वृत्तामुळे खळबळून जागे झालेल्या जेएमसीचे व्यवस्थापक रविप्रसाद, सुपवायझर प्रवीण गुप्ता, इंजि. महेश, सरपंच कल्पना निमकर, मानवाधीकार संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र लेंडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जागेची पाहणी केली व कामगारांना लावून परिसर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने साफसफाई करण्यात आली. यापुढे हा परिसर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने लवकर उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले आहे. येत्या काही दिवसात या परिसरात सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)