शिर्डीबाबत राजकीय पक्षांची ‘सबुरी’, विखेंची भूमिका महत्त्वाची  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:19 AM2019-03-18T06:19:57+5:302019-03-18T06:20:37+5:30

पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ पुनर्रचनेत २००९मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित होऊन शिर्डी मतदारसंघ बनला. त्यानंतर इथे जातीय समीकरणे अधिक मजबूत होत गेली

The role of the political party is 'Saburi' and it is important for Shirdi | शिर्डीबाबत राजकीय पक्षांची ‘सबुरी’, विखेंची भूमिका महत्त्वाची  

शिर्डीबाबत राजकीय पक्षांची ‘सबुरी’, विखेंची भूमिका महत्त्वाची  

Next

- शिवाजी पवार

पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ पुनर्रचनेत २००९मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित होऊन शिर्डी मतदारसंघ बनला. त्यानंतर इथे जातीय समीकरणे अधिक मजबूत होत गेली. सर्वच राजकीय पक्षांनी त्यास आपापल्यापरीने खतपाणी घातले. आरक्षित असल्याने राजकीय पक्षांचे या मतदारसंघाकडे पाहण्याचे धोरणही ‘सबुरीचे’ असल्याचे दिसून येते.
१९६२ च्या लोकसभेपासून (१९९६ चा अपवाद वगळता) मतदारसंघावर कायमच काँग्रेसची पकड राहिली आहे. मात्र, आरक्षित झाल्यानंतर शिर्डी मतदारसंघ काँग्रेसच्या हातून सुटला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अहमदनगरची जागा टॉप प्रॉयरिटीची असल्याचे सांगितले. मात्र ५० वर्षे काँग्रेसचा गड असलेल्या शिर्डीबाबत ‘सबुरी’ का बाळगली? यावरून शिर्डी काँग्रेसकडूनही बेदखल झाल्याचे दिसते.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव कोल्हे, मधुकर पिचड, यशवंतराव गडाख यांच्यापासूनच सर्वच प्रस्थापित नेते या मतदारसंघात फारसा रस दाखवत नाहीत. त्याचा फायदा सेनेला होतो. याहीवेळी काँग्रेस-राष्टÑवादीचे सगळे लक्ष अहमदनगरच्या जागेवर आहे. शिर्डीबाबत कुणीच बोलत नाही.
काँग्रेसकडून श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे, उत्कर्षा रुपवते, युवक काँग्रेसचे नेते हेमंत ओगले, प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या नावांची सध्या चर्चा आहे.
दुसरीकडे भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे यांच्या रुपाने सलग दोन वेळा (अर्थात मोदी लाटेमुळे) वर्चस्व गाजविलेल्या शिवसेनेची स्थितीही फार चांगली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फार पूर्वीच विद्यमान खासदार या नात्याने लोखंडे यांची उमेदवारी घोषित केली. मात्र, त्यानंतर निरीक्षक आणि संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या पक्षाच्या तालुकावार बैैठकांमध्ये शिवसैैनिकांनी लोखंडे यांच्याविरोधात रोष व्यक्त केला आहे. उमेदवार बदलासाठी शिवसैैनिकच आक्रमक झाल्याचे चित्र दिसले होते. मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी खा. लोखंडे यांच्यासमवेत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सेनेला बळ मिळाले आहे.
निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना चालना देण्याव्यतिरिक्त लोखंडे यांच्याकडे सांगण्यासारखे काम नाही. लोखंडे यांच्याशिवाय सेनेकडून माजी मंत्री बबनराव घोलप (नाशिक) यांच्या कुटुंबीयातील सदस्य, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, साहित्यिक लहू कानडे यांच्या नावांचीही चर्चा आहे. माजी खासदार वाकचौरे हे प्रथम सेनेकडून निवडून आले. गतवेळी ते काँग्रेसमध्ये होते. नंतर भाजपात गेले. आता पुन्हा युती झाल्याने ते सेनेचा दरवाजा ठोठावत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड बन्सी सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संतोष रोहम निवडणूक लढविणार आहेत. राखीव मतदारसंघ असल्याने विखे-थोरात-पिचड-गडाख या बड्या नेत्यांचा आशीर्वाद मिळेल का? याच आशेवर अनेक उमेदवार असतात. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना परावलंबी होण्याची वेळ आली आहे.

सध्याची परिस्थिती

बहुजन वंचित आघाडी, स्वाभिमानी, पीपल्स रिपब्लिकन काँग्रेस आघाडीत आल्यास हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला जाऊ शकतो. सुजय सेनेचा व राधाकृष्ण विखे काँग्रेसचा प्रचार करणार का, याची उत्सुकता आहे.

तालुकानिहाय मेळाव्यांमध्ये खा. लोखंडे यांना शिवसैनिकांचा मोठा रोष पत्करावा लागला. ही चर्चा मातोश्रीपर्यंत पोहोचली. त्यामुळे लोखंडे यांची उमेदवारी जाहीर करण्याची कोणतीही घाई शिवसेना करणार नाही. कदाचित इथे ऐनवेळी उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.

अहमदनगर हा राष्ट्रवादी, तर शिर्डी मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीलाच राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केल्याने शिर्डीची जागा आता काँग्रेसलाच राहील. मात्र ही जागा काँग्रेस लढविणार की घटक पक्ष हे अद्याप ठरलेले नाही. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने शिर्डी मतदारसंघात शिवसेनेला बळ मिळणार आहे.

Web Title: The role of the political party is 'Saburi' and it is important for Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.