Navratri 2018 : नगर ते तुळजापूर प्रवास : तुळजाभवानीच्या पलंग अन् पालखीचा मान नगरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:34 PM2018-10-12T13:34:12+5:302018-10-12T13:51:14+5:30

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे महत्त्वाचे स्थान आहे. तुळजापूर येथील नवरात्र उत्सव काळात मूर्तीला पालखीमधून सीमोल्लंघन केले जाते.

Navratri 2018 : Tradition of Navratri celebration at Tuljapur Bhawani mata temple | Navratri 2018 : नगर ते तुळजापूर प्रवास : तुळजाभवानीच्या पलंग अन् पालखीचा मान नगरला

Navratri 2018 : नगर ते तुळजापूर प्रवास : तुळजाभवानीच्या पलंग अन् पालखीचा मान नगरला

googlenewsNext

- अनिल साठे
अहमदनगर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे महत्त्वाचे स्थान आहे. तुळजापूर येथील नवरात्र उत्सव काळात मूर्तीला पालखीमधून सीमोल्लंघन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्यासह राज्यातील अनेकांचे कुलदैवत असलेल्या कुलस्वामिनीच्या मंदिरातील प्रथा-परंपरा शेकडो वर्षांपासून आजही भक्तिभावाने अखंडपणे जोपासल्या जात आहे. सीमोल्लंघनानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यत पलंगावर निद्रीस्त अवस्थेत ठेवले जाते. ही परंपरा जोपासण्यासाठी लागणारी पालखी व पलंग पुरवण्याचा मान अहमदनगर शहराला लाभला आहे.

तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला लागणारा पलंग आणि पालखी घेऊन येण्याचा मान नगर तालुक्यातील बु-हाणनगर गावाला आहे. येथील रहिवासी भगत यांना पालखीचा तर नालेगावातील पलंगे यांना पलंगाचा मान मिळालेला आहे. तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात गेल्यानंतर उजव्या हाताला एका ओवरीत देवीचा पलंग दिसतो. त्या पलंगावर देवीची मूळ मूर्ती काढून भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्या, अश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा व पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत निद्रेसाठी ठेवली जाते. याला देवीची ‘घोर निद्रा,’ ‘श्रम निद्रा’ व ‘भोग निद्रा’ म्हटले जाते. तत्पूर्वी सीमोल्लंघनासाठी हीच मूर्ती पालखीत ठेवून मुख्य मंदिराभोवती मिरविली जाते. विशेष म्हणजे पालखी सीमोल्लंघनानंतर लगेचच तोडून होमात टाकली जाते. तर दस-यानंतरच्या पौर्णिमेदिवशी जुना पलंग होमात टाकून नवा पलंग ठेवला जातो. पलंग-पालखी वेगवेगळ्या जागी तयार होऊन तुळजापूरपर्यंत पोहचतात. पलंग-पालखी तयार होण्यापासून ते शेवटपर्यंत हा सर्व प्रवासच अनोखा आहे.

तुळजाभवानी देवीचा पलंग घेऊन येण्याचा मान परंपरेने अहमदनगर शहरातील तेली समाजातील पलंगे घराण्याला आहे. सध्या बाबूराव अंबादास पलंगे याचे मुख्य मानकरी असून नगर शहरातील नालेगावातील तुळजाभवानी मंदिराचे ते पुजारी आहेत. तुळजापूरप्रमाणे इथेही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. देवीचा पलंग तुळजापूरला घेऊन येण्याचा मान भलेही पलंगे घराण्याला असला तरी तो तयार करण्यासाठी राबणारे हात अनेक आहेत. प्रत्यक्षात देवीचा पलंग तयार करण्याचे काम पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील ठाकूर घराणे परंपरेने करते. श्रद्धापूर्वक पलंग तयार करून दिल्यानंतर ठाकूर यांचे काम संपते. घोडेगावावरून वाजत-गाजत पलंगाचा प्रवास महिनाभर सुरू असतो. या दरम्यान पलंग जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, पारनेरमार्गे नगरपर्यंत प्रवास करत असतो.

अगदी घटस्थापनेच्या दिवशी पलंग अहमदनगरमधील तुळजाभवानी मंदिरात दाखल होतो. दोन दिवस मुक्काम केल्यानंतर तिस-या माळेला पलंग नगरजवळील भिंगार येथील हनुमान मंदिराकडे प्रस्थान करतो. याचवेळी राहुरी येथे तयार झालेली देवीची पालखी भिंगारमध्ये दाखल होते. अतिशय नयनरम्य सोहळ्यात तेथे पलंग आणि पालखीच्या भेटीचा सोहळा संपन्न होतो. तेथून पुढे तुळजापूरला पलंग घेऊन जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील खुंटेफळ, चिंचोडी पाटील, सय्यदपीर आणि कुंडी या चार गावचे लोक मानकरी म्हणून सोबत असतात. अशारीतीने अहमदनगर जिल्ह्यातील नगर, भिंगार, जामखेड, बीड जिल्ह्यातील आष्टी, भूम, चिलवडी, आपसिंगामार्गे दस-याच्या आदल्यादिवशी तुळजापुरात दाखल होतो.

ज्याप्रमाणे तुळजाभवानीची मूळ मूर्ती काढून पलंगावर झोपवली जाते. दरवर्षी सीमोल्लंघन खेळण्याकरिता मूर्तिला पालखीतून मुख्य मंदिर परिसरातून प्रदक्षिणा काढून मिरवले जाते. ही पालखी आणण्याचा मान अहमदनगर शहरालगत असणा-या बु-हाणनगर गावातील भगत नावाच्या एका तेली घराण्याकडे आहे. पलंगाप्रमाणे पालखी तयार करण्याची कथाही काही वेगळीच आहे. त्यानुसार तुळजाभवानीच्या दरबारात पालखी आणून ती मिरविण्याचा मान जरी भिंगारच्या तेली घराण्याला आहे. फार पूर्वी तुळजाभवानीची पालखी नगरजवळील हिंगणगावला तयार व्हायची. पुढे अहिल्यादेवी होळकरांच्या घोगरे नावाच्या सरदारांनी पालखी तयार करण्याचा मान स्वत:कडे घेऊन आपले जहागिरीचे ठिकाण असणा-या राहुरीत ती तयार करण्याची प्रथा सुरू केली. पालखीच्या तयारीतही अनेक मानकरी आहेत. त्यानुसार दरवर्षी भाद्रपद प्रतिपदेला पालखीसाठी लागणारे लाकूड राहुरीच्या म्हेत्रे म्हणजे माळी घराण्याकडून येते. कदमांकडून पालखीसाठीचे उभे लाकूड ज्याला शिपाई म्हटले जाते तेच फक्त देण्यात येते. पालखीच्या खालच्या बाजूला बोरीचे लाकूड तर इतर लाकूड पूर्णपणे सागवानाचे असते. ते राहुरीतील पटेल सॉ मिलवाले द्यायला लागले. खांद्यासाठीचा मोठा दांडा असतो तो जुनाट वापरला जातो. पालखीचे लाकूड मिळाल्यानंतर ती तयार करण्याचा मान राहुरीतील कै. उमाकांत सुतारांच्या घराण्याला आहे.

यावेळी लाकडाची कतई करण्याचे काम धनगर समाजातील भांड घराणे करते. तर लोहाराचे रणसिंग घराणे खिळेपट्टी करते. अशा रीतीने पालखी तयार झाली की तिची सुताराकडून विधिवत पूजा करून तेली समाजातील धोत्रे घराणे पालखीला राहुरीतील तुळजाभवानी मंदिरात घेऊन जातात. यावेळी दिवे कुंभार पुरवितात तर तेली तेल देतात. खाली घोंगडी अंथरण्याचे काम धनगर सगाज करतात. राहुरीतील तुळजाभवानी मंदिराकरिता धोंडीबा घोगरे यांनी स्वत:ची जागा दान केलेली आहे. देवीचे पुजारीपण धोत्रे नावाच्या तेली बांधवाकडे आहे. भाद्रपद पौर्णिमेला पालखी नगरजवळील भिंगार गावाकडे रवाना होते. ती नदी पार करून देण्याचा मान कोळी समाजाला आहे. यावेळी ढोर आणि चांभार समाज मशाल धरतात. सुपा, पारनेर, हिंगणगाव, नगरमार्गे ४० गावांतून तिस-या माळेला पालखी भिंगार गावात दाखल होते. घटस्थापनेच्या तिस-या दिवशी भिंगारमध्ये पलंग-पालखीची अभूतपूर्व भेट झाल्यानंतर दोन्ही तुळजापूरच्या दिशेने रवाना होतात. जामखेड, आष्टी, भूम, चिलवडी, अपसिंगामार्गे सतत २४ तास पलंगाचा प्रवास पूर्ण होऊन दस-याच्या दिवशी संध्याकाळी पलंग तुळजापुरात दाखल होतो. पूर्वी पालखीही याच पद्धतीने यायची, मात्र अलीकडे ती गाडीतून थेट दाखल होते. पलंग आणि पालखी टेकविण्याकरिता तुळजापुरातील शुक्रवार पेठेत स्वतंत्र ओट्याची व्यवस्था केलेली आहे.

रात्री उशिरा पलंग आणि पालखीची तुळजापूर गावातून स्वतंत्रपणे मिरवणूक निघते. अगदी पहाटेच्या सुमारास पलंग आणि पालखी तुळजाभवानी मंदिरात दाखल होतात. देवीचे सीमोल्लंघन हे दस-याच्या दुस-या दिवशी पहाटे सूर्योदयाबरोबर होत असल्याने मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. याच वेळी मंदिरातील भोपे पुजारी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन गुंडाळून पालखीत ठेवतात. तेव्हा बार्शी तालुक्यातील आगळगाव व गोमाळ्याचे लोक पालखीला खांदा देऊन अगदी पाच मिनिटांत मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालतात तेव्हा अपसिंग्याचे डांगे देवीवर छत्री धरतात. माया मोर्तबचा मुखवटा, कर्गनचे क्षीरसागर तेली, कर्जतचे सुतार दिवटी घेऊन देवीपुढे चालतात. तर राहुरीचे मुस्लिम पलंगाच्या पुढे वाद्य वाजवत तो मुख्य मंदिरापुढे आणून ठेवतात.

देवीची एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखीतून उचलून देवीला पलंगावर झोपविण्यात येते. तेव्हा हा पलंग देवीच्या मुख्य गाभाºयात ठेवण्यात येतो. पालखीची मिरवणूक झाली की अगदी विधिपूर्वक त्याचे वरचे दांड काढून पालखी मोडून होमात टाकली जाते. तर पुढील पौर्णिमेपर्यंत म्हणजे ४ दिवस पलंगावर झोपल्यानंतर पुन्हा देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर पौर्णिमेला पलंग तोडून तोही होमात टाकून नष्ट केला जातो. अगदी सन्मानपूर्वक पलंग आणि पालखीचा प्रवास पुणे आणि नगर जिल्ह्यात सुरू होऊन मंदिरात समाप्त होतो. फक्त देवीची सेवा म्हणून नि:शुल्कपणे नगर आणि भिंगारचे तेली बांधव देवीच्या चरणी आपली चाकरी अखंडपणे पुढे चालवत आहेत.

देवाचा पलंग असो की पालखी. या दोन्ही धार्मिकदृष्ट्या पवित्र मानल्या गेल्याने वापर झाल्यानंतर त्या वस्तू मंदिरातच कुठे तरी व्यवस्थितपणे सांभाळून ठेवून पुन्हा त्याचा वापर केला जातो. याच्या उलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही वस्तू एकदा वापर झाल्या की त्या विधिपूर्वक व सन्मानपूर्वक तोडून होमात टाकून जाळून टाकल्या जातात. त्याची राख देवीच्या मूर्तिला लावल्याखेरीज नित्य पूजा संपन्न होत नाही हे वैशिष्ट्य आहे.

 

Web Title: Navratri 2018 : Tradition of Navratri celebration at Tuljapur Bhawani mata temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.