संप मिटला नाही पेटला : शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीची वज्रमूठलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही. उलट आत्ताच खरा संप पेटला आहे. शेतकऱ्यांनी सोमवारी ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यवतमाळात हा बंद यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध संघटना एकवटल्या असून शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी सोमवारी कडकडीत यवतमाळ बंद पाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन समितीने पत्रकार परिषदेत केले.समितीचे निमंत्रक देवानंद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २०१५ ची दुष्काळी मदत अद्याप दिली नाही. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर आमचा विश्वास उरला नाही. शेतकऱ्यांचा संप हा सर्व समाज व्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन केली. उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये आम्ही सहभागी असून यवतमाळात कडकडीत बंद पाळण्यात येईल. या समितीमध्ये लोकजागृती मंच, युवा शेतकरी संघर्ष समिती, विदर्भ राज्य आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जनता दल युनायटेड महिला आघाडी, ओबीसी संघटना, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद, विदर्भ मुस्लिम मोर्चा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बेंबळा कालवेग्रस्त संघर्ष समिती, प्रहार, मुव्हमेंट फॉर पिस अँड जस्टीस, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, गोर सेना आदी संघटना सहभागी आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याला पाठिंबा दिला आहे. मात्र भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी सहभागी होण्यास नकार दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देवानंद पवार यांनी दिली. असे असेल आंदोलन सकाळी ८ वाजता बसस्थानक चौकात डॉ.आंबेडकर आणि नाट्यगृह परिसरातील शिवाजी महाराज, येरावार चौकात महात्मा फुले, जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले जाईल. या फेरीदरम्यान नागरिकांना आपापली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन समिती करणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आज यवतमाळ बंद
By admin | Updated: June 5, 2017 01:15 IST