यवतमाळ : यवतमाळचा दुर्गोत्सव देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. याची प्रचिती या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांवरून येते. यावर्षी दुर्गोत्सव मंडळांनी साकारलेल्या देखाव्यांची भुरळ परजिल्ह्यांनाही पडली आहे. यातून हजारो भाविक यवतमाळात दर्शनासाठी येत आहे. यवतमाळात येणाऱ्या भक्तांनी येथील आर्थिक उत्पादनात भर पडली आहे.शतकाची परंपरा लाभलेल्या यवतमाळच्या दुर्गोत्सवात दरवर्षी भर पडत आहे. यावर्षीही अशीच भर उत्सवाच्या देखाव्यात पडली. याचा परिणाम दर्शना करीता येणाऱ्या भाविकांवर झाला आहे. पहिल्या दिवसांपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांचे लोंढे यवतमाळ शहराकडे वळले. शनिवार आणि रविवारपासून या गर्दीत मोठी भर पडली. यवतमाळ शहराकडे येणाऱ्या भाविकांना घेऊन येणारी वाहने खचाखच भरलेली असतात. याचा फायदा राज्य परिवहन महामंंडळासोबतच खासगी वाहनांना झाला . दररोज हजारो भाविक यवतमाळात येतात. हा आकडा दररोेज वाढत आहे. प्रत्येक मंडळाने अन्नदानाचे पवित्र कार्य हाती घेतले आहे. या ठिकाणी भक्तांच्या लांबलचक रांगा असतात. प्रसादासाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे बाहेर गावाहून आलेली मंडळी हॉटेल्स आणि लगतच्या उपहारगृहात प्रचंड गर्दी करतात. यातून हॉटेल्स आणि खानवळी व्यावसायिकांचा व्यवसाय वाढला आहे. यवतमाळात दुर्गोत्सवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना घेवून येणाऱ्या वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. एसटी बसेस, खासगी बसेस आणि छोटी वाहने प्रवाशांना घेऊन धावत आहेत. यातून राज्यपरीवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. दररोज शहराकडे येणाऱ्या प्रवाशांच्या लोंढ्यांनी यवतमाळ शहराच्या आर्थिक उत्पादनात भर घातली आहे. यातून यवतमाळची आर्थिक उलाढाल वाढली आहे. यातुनच यवतमाळ शक्तीपीठ झाल्याचाच भास होत आहे. (शहर वार्ताहर)
यवतमाळ बनले शक्तीस्थळ
By admin | Updated: October 3, 2014 02:16 IST