संजय राठोड : अधिकाऱ्यांचेही मूल्यमापन करणारवणी : पालकमंत्री संजय राठोड वणीत येत्या ७ आॅगस्टला दुसरा जनता दरबार घेणार आहे. त्यामध्ये यावेळी दाखल झालेली एकही तक्रार येणार नाही. जुन्या जनता दरबारातील सर्वच तक्रारींचा निपटारा झालेला असेल. प्रत्येक तक्रारकर्त्याला त्याच्या तक्रारीचे काय झाले, याचे लेखी उत्तर काही दिवसातच मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली.वणीत शुक्रवारी दुपारी २ वाजता सुरू झालेला जनता दरबार पालकमंत्र्यांनी तब्बल सात तास चालविला. रात्री ९ वाजता त्यांनी महसूल भवन सोडले. तरीही शिल्लक राहिलेल्या तक्रारींचा निपटारा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार रात्री उशिरापर्यंत करीत होते. वणी उपविभागातून तक्रारींचा आलेला पाऊस बघून येथील सरकारी कार्यालयात सामान्य जनतेचे काय हाल होत असेल, याची प्रचिती पालकमंत्र्यांना आली. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या गतीमध्ये वाढ करण्यासाठी अधिकाऱ्यांचे वरचे वर मूल्यमापन करण्याचे ठरविले. त्यासाठी मंत्रालयीन सचिव दर्जाचे अधिकारी नेमण्यात आल्याचे राठोड यांनी सांगितले.शासनाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना हाती घेतल्या आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्ह्याला १०६ कोटी रूपये देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४१३ गावे विविध योजनांच्या माध्यमातून परिपूर्ण केली जाणार आहे. पुढील वर्षभरात मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विजेची जोडणी देण्यात येणार आहे. शेतीसाठी नवनवे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग राबविले जाणार आहे. प्रत्येक गाव व कुटुंबाचे सुक्ष्म नियोजन आणि सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जाणार आहे. शिव रस्ते व पांदण रस्ते मोकळे करण्याचा धडक कार्यक्रम राबविला जाणार आहे. तसेच येत्या सहा महिन्यात नवे जनताभिमुख वाळू धोरण आणणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. येथील सेतू केंद्राच्या गलथान कारभाराची माहिती पत्रकारांनी त्यांना दिली. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना येथील महसूल अधिकाऱ्यांना दिल्या जाईल. आवश्यकता पडल्यास खासगी सेतू बंद करण्याचा निर्णय शासन घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.ओव्हरलोड वाहतुकीवरून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. ओव्हरलोड वाहतुकीचे वाहन पकडून त्यांना तीन महिन्यासाठी निलंबित करा, येत्या १५ दिवसात केलेल्या कारवाईवरून तुमचे मूल्यमापन केले जाईल. त्यात उदासीनता दिसून आल्यास अधिकाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल, असा दम जनता दरबारात पालकमंत्री राठोड यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिला. (स्थानिक प्रतिनिधी)जनता दरबार नियमित भरणारउपविभागीय स्तरावरील जनता दरबार आता नियमित भरणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यापूर्वी हाच प्रयोग आपण आपल्या दिग्रस मतदार संघात राबविल्याचे त्यांनी सांगितले. तेथे आता जनता दरबार भरविल्यास नाममात्र तक्रारी येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यात आपण हा प्रयोग सुरू केल्याचे ते म्हणाले. या दरबारातून नागरिकांना न्याय मिळण्याची प्रक्रिया गतीमान होणार आहे. परिणामी पुढील काही जनता दरबारात तक्रारींचा ओघ कमी दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जनता दरबारातून दोन दुचाकींची चोरीवणीतील कायदा व व्यवस्था कशी चोख आहे, हे चोरट्यांनी पालकमंत्र्यांनाच दाखवून दिले. तक्रार घेऊन आलेल्या दोन नागरिकांच्या दुचाकी तहसील कार्यालय परिसरातून चोरट्यांनी लांबविल्या. ही बाब दुचाकी मालकाने मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. अखेर गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. परंतु चोरटे अद्याप गवसले नाही.
प्रत्येक तक्रारकर्त्याला मिळणार लेखी उत्तर
By admin | Updated: May 17, 2015 00:15 IST