वन विभागाची तत्परता : ‘लोकमत’च्या वृत्ताची घेतली दखलमारेगाव : ‘पाण्याअभावी वन्यप्राण्यांची भटकंती’ अशा आशयाचे वृत्त दैनिक ‘लोकमत’ने प्रकाशित करताच त्याची दखल घेत वन विभागाने वन्यप्राण्यासाठी जंगलामध्ये बोअरवेल खोदून सौर ऊर्जेवर चालणारे मोटारपंप बसविले आहे. वन विभागाच्या या कृतीचे वन्यप्रेमींनी स्वागत केले आहे.यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याचे स्त्रोत निकामी झाले. पाणी टंचाईच्या झळीने सामान्य नागरिक हैराण असताना जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यप्राणीही पाण्याच्या शोधात मनुष्य वस्तीकडे धाव घेत आहे. वन्यप्राणी आयतेच पाण्याच्या शोधात मनुष्य वस्तीकडे येत असल्याने शिकारी या संधीचा फायदा घेत वन्यप्राण्यांच्या शिकार करीत असल्याने वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर वन विभागाने त्याची गंभीर दखल घेत वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी जंगलात बोअरवेल खोदून छोटे तळे तयार करून पाण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नुकतेच तालुक्यातील फिस्कीच्या जंगलात वन विभागाने बोअरवेल खादून सौर ऊर्जेवर चालणारा मोटारपंप बोअरवेलवर बसविला आहे. आता जंगलात छोटे-छोटे तलाव करून बोअरवेलचे पाणी त्या तलावांत सोडले जाणार आहे. वन विभागाच्या या निर्णयाचे वन्यप्रेमी व नागरिकांनी स्वागत केले आहे. (शहर प्रतिनिधी)
वन्यप्राण्यांसाठी जंगलात बोअरवेल
By admin | Updated: April 27, 2016 02:36 IST