भटकंती : हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याची नागरिकांमध्ये भीतीउमरखेड : उन्हाळ्याला प्रारंभ होताच जंगलातील जलस्रोत आटले आहे. वन्य जीव पाण्याच्या शोधात सैरभैर झाले असून पाण्याच्या शोधात गावकुसात शिरताहेत. यातून हिंस्त्र प्राण्यांचे मानवावर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाच्या योजना अद्यापही केवळ कागदावरच दिसत आहे. आर्णी तालुक्यात चौफेर जंगल आहे. कोणत्याही गावात जा शेतशिवारालगत जंगल आहे. पूर्वी घनदाट असणारे जंगल आता विरळ झाले आहे. या जंगलांमध्ये असलेल्या जलस्रोतांवर तृणभक्षी व हिंस्त्र प्राणी आपली तहान भागवितात. परंतु अलीकडच्या काळात पाणीटंचाईची झळ या प्राण्यांनाही बसत आहे. यासाठी वनविभाग जंगलात पाणवठे निर्माण करते. परंतु यावर्षी पाणवठे केवळ कागदावर दिसत आहे. पाण्याच्या शोधात प्राणी शेतात व गावात शिरतात. त्यातून शेतकऱ्यांवर हल्ले होत आहे. रात्री शेताच्या रक्षणासाठी जाण्याचीही शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. तसेच तृणभक्षी प्राणी उभ्या पिकांची नासाडीही करीत आहे. यावर्षी उमरखेड तालुक्यातील बंदीभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात नागरिकांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटले आहे. त्यामुळे वन्यजीव व पशुपक्षीसुद्धा गावाकडे पाण्यासाठी भटकत आहेत. या प्राण्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. विशेषत: जंगलाशेजारी असलेल्या शेतांमध्ये हे प्राणी मजूरवर्गाला अनेकदा आढळले आहे. (शहर प्रतिनिधी)
तालुक्यात वन्यजीव झाले सैरभैर
By admin | Updated: June 4, 2015 02:15 IST