पांढरकवडा : तालुक्यातील शेतकरी वर्ग वन्यप्राण्यांच्या हैदोसापायी अक्षरश: रडकुंडीस आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.परिसरातील बहुतेक भाग हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे जंगलाच्या आजुबाजूला असणाऱ्या शेतात जंगलातील हरिण, रोही, रानगायी या जंगली जनावरांचे कळप शेतात घुसून शेतातील मौल्यवान अशा हिरव्यागार पिकांचे नुकसान करीत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी कशीबशी जगविलेली पिके आता वन्यप्राणी नष्ट करीत आहे. आधीच शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागत आहे. कशीबशी कपाशी व इतर बियाण्यांची उगवण होऊन हिरवगीर पिके डोलायला लागली. परंतु अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी या नव्या संकटामुळे पळाले आहे. संपूर्ण वर्षभराची मेहनत या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे वाया जात आहे. त्यामुळे पुढील जीवन कसे जगावे, असा यक्षप्रश्न शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला आहे. या वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे वाढत्या तक्रार सतत येऊ लागल्या असून वन अधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत विनंती केल्यास, शेतकऱ्यांनी स्वत:च आपल्या शेताची रखवाली करण्याच्या सूचना वनाधिकारी देतात. शेतकऱ्यांचे एखादे जनावर जंगलात गेले, तर वन विभागाचे कर्मचारी त्या जनावराला कोंडवाड्यात टाकतात. परंतु वन्य प्राण्यांच्या हैदोसापायी हजारो शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानाबाबत वन विभाग कोणतीच दखल का घेत नाही, असा शेतकरी बांधवांचा सवाल आहे. वन्यप्राणी सरंक्षण कायद्यानुसार वन्यप्राण्यांचे संरक्षण होत असल्याने दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. परंतु वन विभाग शेतकऱ्यांना या वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीस पायबंद घालण्यासाठी असमर्थ ठरले आहे. त्यामुळे जंगलाजवळील शेती करणे आता कठीण झाले आहे. शासनाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
By admin | Updated: August 3, 2015 02:18 IST