लाखो रुपये वाया : अनेक भागात पाणी पोहोचतच नाहीदारव्हा : शहरातील आठवडीबाजार परिसरात लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली. परंतु या टाकीवरून अनेक भागात पाणीच पोहचत नसल्याने ही टाकी पांढरा हत्ती ठरल्याचे दिसून येत आहे.सन २०११ मध्ये तब्बल ५४ लाख रुपये खर्च करून तीन लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी बांधकाम, ऊर्ध्व वाहिनी व वितरण व्यवस्थेची कामे करण्यात आली. मात्र तरीसुद्धा या परिसरातील रहिवाशांची तहान भागू शकली नाही. पूर्वीच्या वॉर्ड क्रमांक आठ या दलीत वस्ती वॉर्डातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे तेथील रहिवाशांचे प्रचंड हाल होत होते. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सोयीकरिता पाणी टाकी व वितरण व्यवस्थेची कामे मंजूर करण्यात आली. २००९ मध्ये तांत्रिक मान्यता व २०१० मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर टाकीचे बांधकाम करण्यात आले. टाकीचे बांधकाम झाल्यानंतर ऊर्ध्व वाहिनीचे काम करण्यात आले. १५० मिमी व १०० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर डिसेंबर २०१२ पासून या योजनेवरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. एकूण ५३ लाख ६६ हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.याच टाकीवरून खाटीकपुरा परिसरात पाणीपुरवठा करण्याकरिता वाढीव काम करण्यात आले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. खर्च करूनसुद्धा त्या भागात पाणी पोहोचत नाही. त्याचबरोबर ज्या भागाकरिता लाखो रुपये खर्च करून टाकी बांधली, त्या वसाहतीमध्येसुद्धा व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या तक्रारींची त्वरित दखल घेऊन पाणीपुरवठ सुरळीत करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)कंत्राटदाराचे बिल काढू नकावाढीव काम केल्यानंतर नागरिकांना पाणी मिळत नसल्याने कामात दुरुस्ती झाल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराचे बिल काढण्यात येवू नये, अशी मागणी मंगळवारला झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. या विषयावर चर्चा झाल्यानंतर तसा निर्णय घेण्यात आला.
दारव्हा येथील पाण्याची टाकी ठरली पांढरा हत्ती
By admin | Updated: May 13, 2016 02:42 IST