एक्साईज-पोलिसांपुढे आव्हान : तंटामुक्त समित्या, दारूविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही कसोटीज्ञानेश्वर मुंदे यवतमाळजिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहे. प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी ‘खऱ्या’ प्रचाराला प्रारंभ झाला आहे. यातून गावागावांत वाहणारा दारूचा महापूर रोखण्याचे खरे आव्हान पोलीस व एक्साईजपुढे आहे. तर तंटामुक्त समित्या, दारूविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही कसोटी लागणार आहे. आता दारूबंदीचे नियोजन काय? असा प्रश्न विचारला जात आहे.यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीसह गट ग्रामपंचायतीतही प्रचाराची चुरस दिसत आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी अवघे काही तास उरले असून प्रत्येक उमेदवार जीवाचे रान करीत आहे. निवडणूक आणि दारू असे ग्रामीण भागात जुनेच समीकरण आहे. पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत याचा अनेकांना प्रत्यय आला. आता दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. या निवडणुकीतही गावागावात दारूचे पाट वाहणार यात शंका नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकीला चांगलीच ‘झिंग’ चढली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराने ‘खास’ नियोजन केले असून ‘ड्राय डे’च्या काळात अडचण जाऊ नये म्हणून जय्यत तयारी चालविली आहे. (नगर प्रतिनिधी) दीड हजार मतदान केंद्रांसाठी तीन हजार पोलीस कर्मचारी तैनात यवतमाळ : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात २५ जुलै रोजी होणाऱ्या ४६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सुरक्षेचा उपाय म्हणून तीन हजार १८६ पोलीस तैनात करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी एक हजार ५६२ मतदान केंद्रावर ६ हजार १८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. गुरूवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावल्या असून गावागावांतील वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या बोलविण्यात आल्या आहेत. तब्बल दोनशे जवान यामध्ये असून जिल्ह्यातील पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, २३ पोलीस निरीक्षक, १०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक हजार ९४४ पोलीस शिपाई , ९०६ होमगार्ड राहणार आहेत. रात्रीपासून पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. आवश्यकता भासल्यास तपासणी नाकेही लावण्यात येणार आहेत. पोलिसांच्या १३७ जीपमधून ही गस्त घालण्यात येणार आहे. यासोबतच निवडणूक विभागानेही प्रत्येक मदान केंद्रावर चार याप्रमाणे एक हजार ५६२ केंद्रावर प्रत्येक चार कर्मचारी राहणार आहे. यासाठी सहा हजार १८८ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. निवडणूक विभागाच्या १३५ बसेस आणि १३० जिप्स राहणार आहेत. गुरूवारी सायंकाळी पाच वजाता जाहीर प्रचार संपल्याने आता घरोघरी जाऊन उमेदवार प्रत्यक्ष भेटी घेणार आहे. रात्र वैऱ्याची असल्याने उमेदवारांना जागरण करावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत शेवटचे दोन दिवस अतिशय महत्वाचे मानले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)
निवडणुकीतील दारूबंदीचे नियोजन काय?
By admin | Updated: July 24, 2015 02:12 IST