पालकांचा सवाल : गावागावात फुटले पेवप्रकाश सातघरे - दिग्रसशाळा-महाविद्यालयात गलेलठ्ठ पगार घेणारे शिक्षक असताना विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावावी लागत असेल तर शाळा-महाविद्यालयाची गरज काय असा सवाल पालक विचारत आहे. सध्या गल्लीबोळात शिकवणी वर्गाचे पीक आले असून शाळा-महाविद्यालयांपेक्षा येथेच गर्दी दिसत आहे. सकाळी दिवस निघाल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत प्रत्येक शहर आणि गावात ट्युशनला जाणारे विद्यार्थी दिसून येतात. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी ओसरली असून प्रत्येक जण शिकवणी लावण्यासाठी धडपडत असतो. वेळ, पैसा आणि शारीरिक धावपळीमुळे विद्यार्थी नेमका अभ्यास कधी करीत असेल हा संशोधनाचा विषय आहे. हसत खेळत शिक्षण आणि मूल्य रुजविण्याची शिक्षण पद्धती गेली कुठे असा प्रश्न आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षक हा खासगी शिकवणी वर्गापेक्षा तज्ज्ञ असतो. अध्यापनाचे त्याने प्रशिक्षण घेतले असते. तसेच गलेलठ्ठ पगारही असतो. मात्र अलिकडे शिक्षक शिकवत नसल्याची बोंब होत आहे. अनेक विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जातात. परंतु पिरेड आॅफ करण्याकडे त्यांचा कल असतो. शाळेला दांडी मारणारे विद्यार्थी ट्युशन क्लासला मात्र न चुकता जाताना दिसतात. विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालयाची सुसज्ज इमारत, बसण्यासाठी पुरेशी जागा, सर्व सुविधा असते. या उलट शिकवणी वर्गात कोंदट वातावरण, बसण्यासाठी अपुरी जागा, संख्या वाढली की अॅडजेस्टमेंट असा प्रकार असतो. अशा वातावरण मुले ज्ञानार्जन कसे करीत असतील असा प्रश्न आहे. मात्र आता पालकांच्याही शिकवणी वर्ग अंगवळणी पडला आहे. प्रतिष्ठित शिकवणी वर्गात आपला मुलगा जातो हे अभिमानाने सांगणारेही पालक आहे. काही वर्षापूर्वी शिकवणी वर्गाला जाणे म्हणजे कमीपणाचे लक्षण समजले जायचे. परंतु आता शिकवणी वर्गात जाणे प्रतिष्ठेचे झाले आहे.
शाळा-महाविद्यालय असताना शिकवणीची गरज काय ?
By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST